Ganesh Naik criticizes Eknath Shinde : नवी मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. जनतेला गृहीत धरून कोणी नाटक करत असेल, तर त्या नाटकाचा तमाशा कसा करायचा हे गणेश नाईकला चांगलेच माहीत आहे, असे विधान करत त्यांनी सत्ताधाऱ्यांनाच इशारा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गणेश नाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझा कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक वाद नाही. मात्र, जनतेला गृहीत धरून निर्णय घेतले जात असतील, लोकांच्या भावना आणि हिताकडे दुर्लक्ष केले जात असेल, तर त्याविरोधात आवाज उठवणे हे माझे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. सत्ता आणि पदाच्या बळावर जनता सर्व काही सहन करेल, असा समज कोणाचाही असू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
गणेश नाईक यांनी पुढे सांगितले की, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या हितासाठी काम करणे ही आपली जबाबदारी आहे. कोणत्याही योजनेच्या किंवा निर्णयाच्या नावाखाली नागरिकांवर अन्याय होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. जनतेच्या हिताविरोधात जाणाऱ्या निर्णयांचा पर्दाफाश करण्यास आपण मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात ‘SIR’च्या नावाने ज्येष्ठ नागरिकाची 4.43 लाखांची फसवणूक; नक्की काय घडलं?
गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईतील विकासकामे, क्लस्टर पुनर्विकास योजना आणि विकास नियंत्रण नियमांवरून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीबाबत गणेश नाईक यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. ही योजना ज्या पद्धतीने राबवली जात आहे, त्यामुळे शहरावरील पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी वारंवार मांडली आहे.
नवी मुंबईच्या भविष्यासाठी नियोजनबद्ध विकास आवश्यक असल्याचे सांगत नाईक यांनी अनियंत्रित बांधकामे आणि लोकसंख्येचा वाढता दबाव याबाबतही चिंता व्यक्त केली आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण सुविधांवर परिणाम होईल, अशा कोणत्याही निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी त्यांची मागणी आहे.
राज ठाकरे यांचा रायगड दौरा! मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून सरकारवर निशाणा
राजकीय वर्तुळात गणेश नाईक यांच्या या वक्तव्याकडे महत्त्वाच्या संकेतांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. महायुती सरकारमध्ये सहभागी असलेल्या दोन प्रभावशाली नेत्यांमधील मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. जरी नाईक यांनी कोणाचेही नाव घेतले नसले, तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, नवी मुंबईतील क्लस्टर योजना आणि विकास आराखड्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेला हा वाद आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गणेश नाईक यांच्या ताज्या विधानामुळे नवी मुंबईतील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून आता या वक्तव्यावर शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
