Download App

“फक्त २० तारखेपर्यंत सहन करा नंतर..” धनुष्यबाण हाती घेताच निलेश राणेंचं सूचक ट्विट

आपण फक्त २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सहन करा. नंतर कधीच आपल्याला कसलाही त्रास मी होऊ देणार नाही.

Nilesh Rane : महायुतीत कोकणातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड घडली. भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र निलेश राणे यांनी भाजप सोडत शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यानंतर राणेंना उमेदवारही जाहीर झाली आहे. निलेश राणे (Nilesh Rane) निवडणुकीची तयारी करत असतानाच त्यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. फक्त २० नोव्हेंबरपर्यंत सहन करा असं सूचक वक्तव्य त्यांनी या ट्विटमध्ये केलं आहे. त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

निलेश राणेंचं ट्विट काय

‘मी तमाम कुडाळ मालवण वासियांना हात जोडून विनंती करतो, की मला खात्री आहे आमदार नाईकांनी आपल्याला फोन करून त्रास द्यायला सुरुवात केली आहे. पण, आपण फक्त २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सहन करा. नंतर कधीच आपल्याला कसलाही त्रास मी होऊ देणार नाही. व्यावसायिकांना, अधिकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या घटकांना फोन करून मला भेटून जा नाहीतर बघून घेईन हे उपक्रम नाईक यांचे सुरू आहेत. कारखाने बंद करून टाकेन अशी धमकी दिली जात आहे. जो सहकार्य करणार नाही त्याला संपून टाकायच्या धमक्या दिल्या जात आहेत. म्हणून मी अगोदर म्हणालो फक्त २० तारखेपर्यंत सहन करा’, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

निलेश राणेंचा अखेर भाजपला रामराम; हाती घेतलं शिवधनुष्य 

वैभव नाईकांना राणेंचं कडवं आव्हान

राणे विरुद्ध नाईक या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक संघर्षातील नवी लढाई यंदा कुडाळ मतदारसंघात होणार आहे. शिवसेनेत प्रवेश करत निलेश राणेंनी तिकीट मिळवलं आहे. या मतदारसंघात त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं आव्हान आहे. निलेश राणे यांच्या उमेदवारीने हा मतदारसंघ राज्यात चर्चेत आला आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक विजयी झाले होते.

त्यानंतर शिवसेनेत फूट पडली. या राजकीय घडामोडींत वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली. या मतदारसंघावर निलेश राणे यांच्यासाठी नारायण राणेंनी दावा केली होता. निलेश राणेंनीही निवडणूक लढण्याची तयारी केली होती. जागावाटपात एकनाथ शिंदेंनी मात्र कुडाळवरील दावा सोडला नाही. त्यामुळे तिढा निर्माण झाला होता. यावर मध्यममार्ग काढण्यात आला. मागील आठवड्यात निलेश राणेंनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. नारायण राणे यांनी सन २००५ मध्ये शिवसेना सोडली होती. त्यानंतर जवळपास वीस वर्षांनंतर राणे कुटुंबातील सदस्याने शिवसेनेत प्रवेश केला.

follow us