Ladki Bahin Scheme : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेत लाखो लाभार्थी बाहेर पडतील अशी चिन्हे दिसू लागली आहेत. आजपासून (4 फेब्रुवारी) अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. तुमच्या कुटुंबाकडे जर चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ आता मिळणार नाही अशी माहिती आहे. दरम्यान, या योजनेत सुरुवातीला सरसकट अर्ज मंजूर करण्यात आले होते. निकषांना जास्त महत्व दिले गेले नव्हते. त्यामुळे राज्यात लाभार्थ्यांची संख्या वाढली. परंतु, आता या निकषांनुसारच लाभ देण्याचे राज्य सरकारने निश्चित केल्याचे दिसत आहे.
‘लाडकी बहीण’साठी सरकारचा आटापिटा; ‘या’ सरकारी योजना बंद होण्याच्या मार्गावर?
पुणे जिल्ह्यात तब्बल 21 लाख 11 हजार 991 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. शासनाने आता चारचाकी वाहन असलेल्या अर्जदारांना अपात्र घोषित करण्याचे ठरवले आहे. महिला बालकल्याण विभागाच सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत याबाबत राज्यातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. परिवहन विभागाने वाहनधारकांची यादी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली आहे. त्यामुळे आता अधिक वेगाने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेची घोषणा करण्यात आली होती. महिलांनी मोठ्या संख्येने अर्ज केले होते. यावेळी सरकारी यंत्रणांनी देखील कोणतीही तपासणी न करता सरसकट अर्ज मंजूर केले होते. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढली. सरकारी तिजोरीवरील ताणही वाढला. राज्य सरकार दरमहा चार हजार कोटी रुपये या योजनेवर खर्च करत आहे. इतके पैसे फक्त एकाच योजनेवर खर्च होत असल्याने महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्याची आर्थिक घडी विस्कटू लागली आहे. याचे भान आता सरकारला येऊ लागले आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
धक्कादायक! यूपी, बंगाली महिलांच्या खात्यात लाडकी बहीणचे पैसे; बोगस लाभार्थ्यांचं रॅकेट
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकारी महिलांच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. चारचाकी वाहन असलेल्या अर्जदारांची नावे राज्य सरकारला पाठवली जातील. त्यानुसार या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याची कार्यवाही होईल. त्यानुसार आता कार्यवाहीस लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे.
लाभार्थी महिलेचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावे.
कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा. प्राप्तिकर भरणाराही नसावा.
संजय गांधी निराधार सारख्या योजनांचे लाभार्थी नकोत.
कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन असल्यास अर्जदार अपात्र ठरेल.