Download App

स्थगिती सरकारचा धिक्कार असो, नुकसानभरपाई जाहीर करा; अजित पवार, अंबादास दानवेंचा हल्लाबोल

Maharashtra Budget :  राज्याच्या अधिवेशनात (Maharashtra Budget) अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, शेतमालाचे पडलेल्या भावाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक या मुद्द्यावर आक्रमक असून सरकारची कोंडी करत आहेत. आज अधिवेशनाच्या सातव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होते. सभागृहातही याच मुद्द्यावर विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला.

वाचा : महाराष्ट्राची बत्ती गूल.. खोके सरकारचे खिसे फूल.. गॅस दरवाढ वीजतोडणीविरोधात विरोधकांचा हल्लाबोल

विकासकामांना स्थगिती देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा, अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे, जाहीर करा जाहीर करा नुकसान भरपाई जाहीर करा, शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, सरकार तुपाशी शेतकरी उपाशी, अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सातवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) आणि अंबादास दानवे (AmbadasDanve) यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

‘हे’ चित्र फक्त एका दिवसापुरतं असायला नको; अजित पवारांनी टोचले सत्ताधाऱ्यांचे कान

दरम्यान, सभागृहातही विरोधकांनी याच मुद्द्यावर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा दुसरे काहीच महत्वाचे नसल्याने यावर सविस्तर चर्चा करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. घोषणाबाजीही सुरू होती. त्यामुळे सभागृहात अन्य कामकाज करता आले नाही. सरकारने या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता तत्काळ नुकसानभरपाई  जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी केली. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव  मदत केली जाईल, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे, असे त्यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=N_-NCOncia8

 

 

Tags

follow us