Maharashtra Child Crime: शाळा- कॉलेजेसच्या गणवेशात दिसणारी मुलं, आता गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल टाकत आहेत. हे फक्त चित्रपटातच नाही, तर आपल्या आजूबाजूला घडत आहे!
पुण्यातल्या एका कॉलनीत नुकताच घडलेला प्रकार महाराष्ट्रातील अल्पवयीन गुन्हेगारीच्या वाढत्या संकटाकडे लक्ष वेधतो. १६-१७ वर्षांच्या काही मुलांनी मिळून रात्रीच्या अंधारात एका मोबाईल दुकानात चोरी केली. पोलिसांनी त्यांना पकडलं असता, “नवा फोन हवा होता, मित्रांकडे पैसे नव्हते,” असं सरळ उत्तर मिळालं. ही घटना ताजी असतानाच मुंबईत काही महिन्यांपूर्वी १५-१६ वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलांनी मिळून आपल्या वर्गमित्राचा खून केला. सोशल मीडियावर वाद, धमक्या आणि ‘इगो’तून या मुलांनी मित्राला शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात बोलावून धारदार शस्त्राने वार केले. पोलीस तपासात हे सर्व फक्त ‘सोशल मीडिया स्टेटस’ आणि ‘इगो’साठी घडलं असल्याचं समोर आलं.
फडणवीसांची ‘चाणक्य’ नीती, राज ठाकरे मोहरा अन् उद्धव ठाकरेंचा गेम?
या घटना पाहता महाराष्ट्रात अल्पवयीन गुन्हेगारीचा स्फोट झाल्याचं स्पष्ट होतंय. NCRB च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र देशात अल्पवयीन गुन्ह्यांच्या एकूण संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर गंभीर गुन्ह्यांमध्ये (खून, चोरी, अपहरण) महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. २०१३ ते २०२२ या दहा वर्षांत महाराष्ट्रात ५५,८५२ अल्पवयीन गुन्हे नोंदवले गेले, तर मध्य प्रदेशनंतर सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांमध्येही अल्पवयीन गुन्ह्यांची संख्या चिंताजनक आहे. उदाहरणार्थ, पुण्यात २०२३ मध्ये पोलिसांनी अटक केलेल्या गुन्हेगारांपैकी ११% हे अल्पवयीन होते, तर नाशिकमध्ये २०२४ मध्ये १०१ अल्पवयीन मुलं गंभीर गुन्ह्यांत सहभागी असल्याची नोंद आहे.
कसोटीतील विराट कोहलीच्या निवृत्तीला जबाबदार कोण? रवी शास्त्रींनी BCCI ला घेरलं
राज्यात अंमली पदार्थांचं संकटही वाढत आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, अनेक अल्पवयीन मुलं गांजा, मेफेड्रॉन, कोकेन, हेरॉइन अशा ड्रग्सच्या आहारी जात आहेत किंवा टोळ्यांसाठी ड्रग्सची वाहतूक करत आहेत. पुण्यात अलीकडेच २० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणात काही अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेली ही पिढी गुन्हेगारीकडे वळतेय आणि त्यामुळे चोरी, मारहाण, खंडणी, अगदी हत्येसारखे गंभीर गुन्हे वाढत आहेत.
या गुन्ह्यांच्या वाढीमागे अनेक सामाजिक आणि आर्थिक कारणं आहेत. स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वाढता वापर, सोशल मीडियावर फेमस व्हायचंय किंवा गेमिंगसाठी पैसे हवे म्हणून काही मुलं चुकीच्या मार्गाने जात आहेत. घरात भांडणं, पालकांचं दुर्लक्ष, आर्थिक अडचणी, चित्रपट आणि वेबसीरिजमधून मिळणारा ‘स्टाईल’चा प्रभाव, तसेच मोठ्या गुन्हेगारांच्या संपर्कात येणं — या सगळ्यांचा परिणाम मुलांवर होतोय. पोलीस सांगतात की, ही मुलं वयानं लहान असली तरी, गुन्ह्याचं नियोजन मोठ्यांसारखं करतात. काही प्रकरणांत अल्पवयीन मुलं मोठ्या टोळ्यांसाठी ‘फ्रंट’ म्हणून वापरली जातात, कारण वय लहान असल्याने शिक्षा कमी होते. त्यामुळे पालक, शाळा आणि समाज यांची जबाबदारी वाढली आहे. मुलांकडे लक्ष देणं, त्यांची मानसिक स्थिती, मित्रमंडळी आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवणं, आणि योग्य मार्गदर्शन देणं — हे आजच्या काळात अत्यावश्यक आहे.