Maharashtra Freedom of Religion Act : महाराष्ट्रात धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधन म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार असून, यासाठी राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. राज्य विधिमंडळाच्या मार्च 2026 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर ते राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते.
Maharashtra Freedom of Religion Act will be implemented from 28th August 2026, Rakshabandhan. Gazette notification published for this. pic.twitter.com/si7sMJaZOh
— ANI (@ANI) August 18, 2026
कायद्यातील प्रमुख तरतुदी
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्यात धर्मांतराशी संबंधित अनेक कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. धर्मांतरासाठी जबरदस्ती, फसवणूक किंवा आमिषाचा वापर केल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्थेविरोधात कठोर कारवाई केली जाईल. दोषी आढळलेल्या संस्थांवर बंदी घालण्याची तसेच दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही कायद्यात समाविष्ट करण्यात आली आहे.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कमाल सात वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच एखाद्या व्यक्तीने पुन्हा असा गुन्हा केल्यास शिक्षेची मुदत दहा वर्षांपर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय धर्मांतर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने आणि धर्मांतर प्रक्रिया पार पाडणाऱ्या व्यक्तीने दंडाधिकाऱ्यांना किमान 60 दिवस आधी लेखी सूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. धर्मांतरानंतरही आवश्यक कागदपत्रे आणि घोषणापत्र सादर करावे लागणार आहे.
कायद्याचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे धर्मांतरित व्यक्तीचे पालक, भाऊ-बहिणी तसेच इतर जवळचे नातेवाईक यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे संशयास्पद किंवा दबावाखाली झालेल्या धर्मांतराच्या प्रकरणांची चौकशी करण्यास मदत होईल, असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.
