Kukadi Irrigation Project : कुकडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डिंबे ते माणिकडोह धरणांना जोडणाऱ्या सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी ५,७०४.५० कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे कुकडी प्रकल्पातून १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, अहिल्यानगरसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिंबे–माणिकडोह बोगद्याच्या (Dimbe-Manikdoh Tunnel Project) महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने कुकडीच्या डाव्या कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न अधिक भक्कम होणार आहे.
16 किलोमीटरचा बोगदा; अतिरिक्त पाणी माणिकडोह धरणात साठणार
डिंबे आणि माणिकडोह ही दोन्ही धरणे कुकडी धरणमालिकेतील महत्त्वाची धरणे आहेत. माणिकडोह धरणाची क्षमता सुमारे १०.५ टीएमसी आहे. मात्र, स्थानिक पावसाच्या पाण्यावर हे धरण अपेक्षित प्रमाणात भरत नाही. दुसरीकडे, डिंबे धरण आणि त्याखालील घोड धरण भरल्यानंतर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी खालच्या भागाकडे वाहून जाते. या पार्श्वभूमीवर डिंबे धरणातून उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे माणिकडोह धरणात वळविण्याची संकल्पना आहे. त्यामुळे पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा अधिक प्रभावी वापर करता येणार असून, माणिकडोह धरणाची साठवण क्षमता पूर्णपणे उपयोगात आणण्यास मदत होणार आहे. माणिकडोह धरणातील पाण्याचा मुख्य उपयोग कुकडी डावा कालवा आणि त्याखालील लाभक्षेत्रातील शेतीसाठी होणार असल्याने या प्रकल्पाचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या (Kukadi Irrigation Project) सुधारित खर्चास ५,७०४.५० कोटी रुपयांची मान्यता मिळाल्याने प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेला मोठे बळ मिळणार आहे. या माध्यमातून १,४४,९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून, पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा व कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला नियमित पाण्याचा आधार मिळाल्यास पीक पद्धतीत बदल होण्याबरोबरच शेती उत्पादन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.
दक्षिण नगरच्या पाणीप्रश्नाला निर्णायक दिशा – सुजय विखे पाटील
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, दक्षिण अहिल्यानगरच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न हा अनेक वर्षांपासूनचा विषय आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर, पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी अडविणे आणि ते दुष्काळी भागाकडे वळविणे या दृष्टीने डिंबे–माणिकडोह बोगदा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. डिंबे धरणातील अतिरिक्त पाणी माणिकडोहकडे वळविल्यानंतर त्याचा उपयोग कुकडी डावा कालवा आणि त्याखालील लाभक्षेत्रासाठी करता येणार आहे. त्यामुळे सिंचनासाठी उपलब्ध पाण्यात वाढ होऊन दक्षिण नगरच्या दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा मिळेल.
आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करा ; CM फडणवीसांचे आदेश
दक्षिण नगरला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. ओव्हरब्रिज, साकळाई योजनेनंतर आता डिंबे–माणिकडोह बोगद्याचा निर्णय झाला आहे. कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या सुधारित खर्चालाही मोठी मान्यता मिळाल्याने सिंचनाचा प्रश्न अधिक व्यापक पद्धतीने मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पुढील पाठपुरावाही केला जाईल,” असं डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.
