Download App

Video : गो बॅक, 50 खोके; सरनाईकांना मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चातून काही मिनिटातचं हुसकावलं!

  • Written By: Last Updated:

MNS Protester On Pratap Sarnaik : मनसेच्या मोर्चात सत्ताधारी पक्षातील मंत्री प्रताप सरनाईक हेदेखील सहभागी होण्यासाठी मीरा-भाईंदरमध्ये दाखल झाले होते. पण, प्रताप सरनाईक यांना मोर्चाच्या ठिकाणी विरोधाला समोरे जावे लागल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे सरनाईक यांना मोर्चाच्या ठिकाणाहून अवघ्या काही मिनिटांतच काढता पाय घ्यावा लागला आहे.

हिंमत असेल तर अटक करा

मराठीसाठी मी मोर्चात सहभागी होणार असून, हिंमत असेल तर, मला अटक करून दाखवा असे थेट चॅलेंज सरनाईक यांनी दिले होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे सरनाईक यांना अवघ्या काही मिनिटांमध्येच काढता पाय घ्यावा लागला आहे. शांततेत सुरू असलेल्या मोर्चात प्रताप सरनाईक दाखल होताच काहीसा गोंधळ बघायला मिळाला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी सुरू करत प्रताप सरनाईक निघून जाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे या मोर्चाच्या ठिकानाहून सरनाईक लागलीच निघालेले दिसले. पोलिसांच्या हुकुमशाही व दडपशाही गुंडगिरीला माझा विरोध आहे. मी देखील मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. हिंमत असेल तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावी असे आव्हान प्रताप सरनाईक यांनी दिले होते.

सरनाईकांच्या अंगावर बाटली भिरकवण्याचा प्रयत्न

मनसेच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मीरा-भाईंदरमध्ये दाखल झालेल्या सरनाईक यांना मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी थेट विरोध केला. एवढेच नव्हे तर, ज्यावेळी सरनाईक पोहोचले त्यावेळी त्यांच्याविरोधात 50 खोके एकदम ओके आणि जय गुजरातच्या घोषणा देण्यात आला. तसेच सरनाईक गो बॅकच्याही घोषणा देण्यात आल्या. यावेळी गर्दीतील व्यक्तीकडून सरनाईक यांच्या अंगावर बाटली फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सरनाईक यांना पोलिसांनी अन्य ठिकाणी नेले.

मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो होतो

मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सोडवण्यासाठी मी आलो होतो. मराठी बांधवांना आणि मीरा-भाईंदरमधील मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो होतो” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. माझ्यासोबत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहेत. त्यामुळे बाकीच्यांना जे काय राजकारण करायचय ते करुं दे. प्रताप सरनाईक मीरा-भाईंदरमधील मराठी जनांच्या पाठिमागे ठामपणे उभा असल्याचे यावेळी सरनाईक यांनी सांगितले. माझी भूमिका ही मोर्चाला पाठिंबा देण्याची होती त्यामुळे मनसे की उद्धव ठाकरे गट राजकारण करतोय? असे विचारले असता अशावेळी मी कोणाला दोष देणार नाही असे सरनाईक म्हणाले.

 

follow us