Download App

विनायक राऊतांनी थेट मुनगंटिवारांना लॅंड माफिया केले; हजारो एकर जमिनी अदानींसाठी बळकावल्या

Vinayak Raut : कोकणात मागील काही वर्षांपासून भूमाफियांचे रॅकेट तयार झाले आहे. या रॅकेटकडून जमीन मालकांना फसवून दलालांमार्फत जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जात आहेत. उद्योगपती गौतम अदानीच्या कंपनीला जमीन उपलब्ध करून देऊन त्याबदल्यात वनखात्याला कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील दोन गावातील शेकडो हेक्टर जमिनी दिल्या गेल्या आहेत. दलालांमार्फत तब्बल 5 हजार एकर जमिनी बळकावण्यात आल्या आहेत, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

खासदार राऊत यांनी आज पत्रकार परिषदे घेत बोगस पद्धतीने जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार केले गेल्याचे सांगितले.

वाचा : ‘शिंदेंनी आपले बाप सुद्धा बदलले.. विनायक राऊतांची घणाघाती टीका 

राऊत म्हणाले, की शेतकरी व जमीन मालकांना दलालांच्या माध्यमातून लुबाडून त्यांच्या जमिनी असताना या मालकांना कोणतीच कल्पना न देता खरेदी विक्रीचे व्यवहार केले गेले आहेत. एकट्या संगमेश्वर तालुक्यातील 20 गावांतील 5 हजार एकर जमिनींचे ग्रामस्थांना फसवून खरेदी विक्री व्यवहार केले गेले आहेत. या जमिनी त्या त्या कंपन्यांना विकल्या. या कंपन्या अदानी समूहाशी संबंधित आहेत. हे करत असताना दलालांकडून प्रशासकीय यंत्रणेलाही हाताशी धरले जात असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

अडीच लाख मतांनी पराभूत करेन.. विनायक राऊत यांचं नारायण राणे यांना जाहीर आव्हान

राऊत पुढे म्हणाले, वनखात्याला जी जमीन द्यायची होती ती या कंपन्यांना दिली गेली. मी सध्या येथे दोन गावांतील व्यवहार आणले आहेत. संगमेश्वर तालुक्यातील निगुडवाडी आणि कुंडी या दोन गावातील जवळपास 123.46 हेक्टर जमीन मागील आठच दिवसात खरेदी केली गेली. या जमिनी ज्यांच्या नावावर आहेत त्यांच्यातील काही तर मयत झालेले आहेत. तरी देखील दुसरे बोगस जिवंत लोक उभे करून व्यवहार केले गेले आहेत.

कुचांबे ते वझरे या गावांतील संगमेश्वरच्या घाटपट्ट्यातील पाच हजार एकर जमिनी थर्मल पॉवर प्रकल्पांना दिल्या गेल्या आहेत. या जमिनी पीआरडब्ल्यूटीएल या सरकारी कंपनीच्या नावे केल्या आहेत. ही कंपनी चंद्रपुरात औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प चालवत आहे. विशेष म्हणजे, ही कंपनी 2015 मध्येच अदानींच्या अदानी ट्रान्समिशन लिमिटेडच्या ताब्यात देण्यात आली आहे.

Narayan Rane : आदित्य ठाकरेंचं नाव घेऊ नका, माझा दिवस खराब जाईल..

या कंपनीला वीज प्रकल्पासाठी जास्तीची जमीन पाहिजे होती. एटीएलच्या चंद्रपुरातील प्रकल्पासाठी 284.27 हेक्टर जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. येथील जमीन वनखात्यात येत असतानाही 2015 मध्ये कंपनीला देण्यात आली. त्यानंतर या वनजमिनीच्या बदल्यात दुसरीकडे वनक्षेत्र दाखविण्यासाठी कोकणातील जमिनी बळकावण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

संगमेश्वर तालुक्यातील जमिनींच्या मूळ मालकांना अंधारात ठेऊन त्यांना फसवून मयत व्यक्तींच्या दुसऱ्या व्यक्ती उभ्या करून त्यांच्या नावाने व्यवहार करण्यात आले.

Tags

follow us