Download App

मविआचा प्लॅन उलटणार की महायुतीला धक्का देणार? विधानपरिषदेचं गणित कुठे फसणार..

विधानपरिषद निवडणुकीतील सध्याची परस्थिती पाहता विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अलर्ट झाले असून राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत.

MLC Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या (MLC Election 2024) आधी राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा आहे. या निवडणुकीत आता चुरस वाढू लागली आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाचे मिलींद नार्वेकर यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. आज उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर 5 जुलैपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत आहे. या मुदतनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी निवडणुकीतील सध्याची परस्थिती पाहता विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अलर्ट झाले आहेत.

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला रेडी पण, 7 मतदारसंघात धास्ती; तिकीट कुणाला मिळणार ?

मविआचा प्लॅन तयार

महाविकास आघाडीकडून सुरुवातीला दोन जागा लढण्याचे ठरले होते. एका जागी काँग्रेस आणि एका जागेवर शरद पवार गट आणि ठाकरे गट शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देतील असे नियोजन होते. परंतु, ठाकरे गटाने तिसरा उमेदवार देऊन निवडणुकीत मोठा ट्विस्ट आणला. ठाकरे गटाच्या या खेळीने निवडणुकीची गणितेच बदलली आहेत. शिंदे गट आणि अजित पवार गट सावध झाला आहे.

आमदारांचे राजीनामे किंवा निधनामुळे विधासभेतील संख्याबळ 14 ने कमी झालं आहे. त्यामुळे विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 23 मतांची आवश्यकता आहे. संख्याबळाचा विचार केला तर भाजप पाच, शिंदे गट आणि अजित पवार गट प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. परंतु, अकराव्या उमेदावाराचं भवितव्य ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या हातात राहणार आहे.

मागच्या अनुभवाने काँग्रेसची सावध पावले

मागील दोन वर्षांपूर्वी निवडणूक झाली होती तेव्हा काँग्रेस अंतर्गत फुटीमुळे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यंदा काही आमदार सोबत नसणार असे गृहीत धरुन पक्षाने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे पंधरा मते आहेत. त्यांना आणखी आठ मतांची गरज आहे. त्यामुळे काँग्रेसची मते वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटातील काही आमदारांशी मिलींद नार्वेकर यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ऐनवेळी जर शिंदेंचे आमदारांनी काही वेगळा निर्णय घेतला तर विधानसभा निवडणुकीआधी हा मोठा धक्का शिंदेंना असू शकतो.

CM शिंदेही तयार, आमदारांचे टोचले कान

विधानपरिषदेत तिसरा उमेवदवार देऊन महाविकास आघाडीने टाकलेला डाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आला आहे. यासाठीच सावध होत त्यांनी काल रात्री सर्व आमदारांची तातडीची बैठक घेतली. या निवडणुकीत महायुतीच्या सर्व नऊ जागा निवडून आणायच्या आहेत. यासाठी तयारीला लागा. आपसात मतभेद होऊ देऊ नका अशा सूचना दिल्या.

मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर

महाविकास आघाडीचे उमेदवार मिलींद नार्वेकर यांचे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांशी असलेले सलोख्याचे संबंध पाहता त्यांना महायुतीतून मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही गोष्ट शिंदेंच्याही लक्षात आली आहे. त्यामुळे त्यांनी बैठक घेत आमदारांना एक प्रकारे इशाराच दिला आहे. नार्वेकरांना विजयी होण्यासाठी पाच ते सहा मतांची गरज आहे.

‘त्या’ संख्येने वाढणार महायुतीचं टेन्शन

या निवडणुकीत महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहिलं तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊ शकतात. तर मविआचे मात्र दोनच उमेदवार निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतरच्या घडामोडी पाहिल्या तर महायुतीत अविश्वासाचं वातावरण तयार होताना दिसत आहे. शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटाच्या तर अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.

या निवडणुकीत तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला फक्त 5 ते 6 आमदारांची गरज आहे. मग अशा परिस्थितीत काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज