Download App

कर्नाटकला पाणी द्यायचं का?; जयंत पाटलांनी सरकारला दिला ‘हा’ सल्ला

Jayant Patil Karnataka Water Demand : कर्नाटकात जलाशयांची पातळी घटल्यानंतर कर्नाटकात महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात येतं. यंदा कर्नाटकच्या जलाशयांतील पाण्याची पातळी घटल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाणी सोडण्याची विनवणी केली आहे. कर्नाटकला 5 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचं पत्र सिद्धरामय्यांनी लिहिलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाटील म्हणाले, कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला पाणी देण्याची विनंती केली आहे. उन्हाळ्यात नेहमी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होत असते. आपल्याकडून पाणी गेल्याशिवाय कर्नाटकमधील सुरुवातीच्या लोकसंख्येला पाणी मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत दोन-अडीच महिने जिकीरीचे जाऊ शकतात.

कर्नाटकच्या घशाला कोरड : CM शिंदेंना पत्र लिहीत महाराष्ट्राकडे मदतीची याचना

महाराष्ट्र सरकारकडून तिथल्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्यासाठी नकार कोणीही देत नाही. कर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे पाण्याची मागणी केली असेल तर राज्यातील पाण्याची शिल्लक पाहून महाराष्ट्रातील लोकसंख्येची पाण्याची आवश्यकता पाहून त्याचा अभ्यास करून काय ते सरकार ठरविल, असे पाटील यांनी सांगितले.

सिद्धरामय्या यांच्या पत्रात काय?

सिद्धरामय्या यांनी पत्रात म्हटलं की, कर्नाटकातील बेळगाव आणि गुलबर्गासह उत्तर कर्नाटकात पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. जनावरांना पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे कृष्णा भीमा नदीपात्रात 5 टीएमसी पाणी सोडावे. आधी कर्नाटकला 3 टीएमसी पाणी सोडण्याची विनवणी केली होती. आता 5 टीएमसी पाण्याची विनवणई करण्यात आली आहे.

बेळगावसह उत्तर कर्नाटकाला पिण्यासाठी दोन टीएमसी पाणी वारणा व कोयना जलाशयामधून सोडले जावे. तसेच महाराष्ट्रातील उजनी जलाशयातून तीन टीएमसी पाणी सोडण्याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या जाव्यात. पाच टीएमसी पाणी जून महिन्यामध्ये सोडण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

Tags

follow us