Download App

आठवले शिर्डीतून लढणार ?, आता थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मेळावा

Ahmednagar News : रिपाईचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डी लोकसभा निवडणूक पुन्हा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्याने नगरच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. रामदास आठवले नुसते वक्तव्य करुनच थांबलेले नाहीत तर त्यांनी आता त्यादृष्टीने जोरदार प्लानिंग करण्यास सुरुवातही केली आहे.

या महिन्यात 28 तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी (जि.अहमदनगर) येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाची जोरदार तयारी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.

शिर्डी लोकसभा : आठवलेंनी वाढवलं खासदार लोखंडेंचं टेन्शन

लोकसभा निवडणुकांना अजून एक वर्षाचा कालावधी आहे. मात्र राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मंत्री आठवले ज्यावेळी नगर जिल्हा दौऱ्यावर येतात त्यावेळी ते शिर्डीतून निवडणूक लढण्याच इच्छा व्यक्त करतात. याआधीही त्यांनी शिर्डीतून निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य केले होते. आता पुन्हा त्यांनी निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे.

खासदार लोखंडेंचे टेन्शन वाढणार 

आता तर पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशनच शिर्डीत होणार आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींमुळे शिंदे गटाचे येथील विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर लोखंडे हे शिंदे गटात सामील झाले होते. आता मात्र, आठवलेंच्या या हालचालींमुळे त्यांचे टेन्शन निश्चितच वाढणार आहे.

पंढरपूर नंतर शिर्डी 

आठवलेंनी 2009 पूर्वी पंढरपूर मतदार संघातून निवडणूक लढली होते. मात्र, 2009 मध्ये मतदारसंघ पुर्नरचना झाल्या आणि पंढरपूर मतदारसंघाऐवजी माढा मतदारसंघाची निर्मिती झाली. शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढणार असल्याने 2009 मध्ये आठवलेंनी शिर्डी लोकसभा मतदाससंघातून निवडणूक लढली होती. तेव्हा त्यांना मतदारांनी नाकारलं होतं. त्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. राज्यात कॉंग्रसचे तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यामुळेच आठवलेंचा पराभव झाला, अशी चर्चा त्यावेळी झाली होती. त्यावेळी शिवसेनेच्या भाऊसाहेब वाघचौरे यांनी 3 लाख 59 हजार 921 मते मिळाली होती. तर रामदास आठवले यांनी 2 लाख 27 हजार 170 मते मिळाली होती.

तरीही शिंदेच मुख्यमंत्री होतील 

विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांनी मात्र या चर्चांवर काहीही ठोस उत्तर दिले नसले तरी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येतच आहे. याबाबत मंत्री आठवले यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, अजित पवार जरी भाजपात आले तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होतील, असे आठवले म्हणाले.

 

Tags

follow us