Download App

‘ऑपरेशनचं सांगू नका, मुका मार आम्हालाही देता येतो’; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला

सध्या महाविकास आघाडी आणि सत्ताधारी गटात आरोप प्रत्यारोपांचे प्रमाण वाढले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यामध्ये आघाडीवर आहेत. त्यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर तोफ डागली.

ते म्हणाले की आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा आमच्यासाठी संपला आहे. याबाबत आम्ही काँग्रेस (Congress) नेत्यांबरोबर चर्चा केली आहे. शरद पवार यांनीही या प्रकरणी मध्यस्थी केली आहे. या देशाची ताकद प्रचंड आहे. विरोधी पक्षाचीही ताकद मोठी आहे.

सत्ताधाऱ्यांना देश गुलाम करून आम्हाला बंधनात जखडून टाकायचे आहे. पण, आता ही बंधने तोडण्याची वेळ आली आहे. आंदोलने होऊच द्यायची नाहीत हा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला.

महाडिकांच्या झोळीत काय? हे ज्याची कुवत आहे त्यालाच कळेल; महादेवराव महाडिक आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी. लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिंदे म्हणाले होते, की ‘कुलपती विजय पाटील म्हणाले तुम्ही आता डॉ. एकनाथ शिंदे होणार. पण, मी याआधीच डॉक्टर झालो आहे. छोटीमोठी ऑपेरशन करत असतो. समाजात इतके वर्षे काम करतोय. जगाच्या विद्यापीठाच्या माध्यमातून खूप शिकलो,’ असे शिंदे म्हणाले.

यावर राऊत यांना शिंदेंना खोचक टोला लगावला. ‘डॉक्टरांना विचारा की वीर सावरकर हे कोणत्या बोटीतून उडी मारून कोणत्या बंदरावर गेले ?, ऑपरेशनचं आम्हाला सांगू नका. आम्हाला मुका मार देतो येतो. तुम्ही ऑपरेशन करत राहा. डॉक्टर महाराष्ट्रात पायलीला 50 मिळतात.’

‘प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळत असते हा अनुभव आहे. अशी डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी झाली पाहिजे. भ्रष्टाचाराचा आरोप होणाऱ्यांना डॉक्टरेट कशी देता ?, शिंदे डॉक्टर झाले असतील तर आनंदच आहे पण, त्यांनी आधी स्वतःवर शस्त्रक्रिया करावी,’ असा टोला राऊत यांनी लगावला.

शीतल म्हात्रे प्रकरणात तत्परता दाखवली, तशीच शिरसाट प्रकरणात दाखवा; अंधारेंच मुख्यमंत्र्यांना आवाहन

लोकांनी सरकारला मते दिलीच नाहीत 

सरकार लोकशाही मार्गाने निवडून आले असले तरी निवडणुका हे भ्रष्ट मार्गाने जिंकले का हा प्रश्न आहे. त्याचे कारण म्हणजे, जनता ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरत आहे त्यावरून असे दिसते की लोकांनी यांना मतदान केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इव्हीएम बाबतीत जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावर आता पुढे जाण्याची गरज आहे.

अदानींकडे मोदींचा पैसा

देशात सध्या बदल्यांचे राजकारण सुरुच आहे. बदला घेण्यासाठी ते अदानीला का वाचवत आहेत. याचे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. अदानी हे फक्त चेहरा आहे यामध्ये सगळे पैसे मोदींचे आहेत त्याचा तपास व्हायला पाहिजे. त्यामुळेच तर मोदी त्यांना वाचवत आहेत, असे केजरीवाल विधानसभेत म्हणाले ते खूप बोलके असल्याचे राऊत म्हणाले.

Tags

follow us