Maharashtra Rain Alert : राज्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Maharashtra Rain) हजेरी लावत आहे. आज अवकाळी पावसाबाबत भारतीय हवामान विभागाने इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. काही भागात उष्णता वाढत आहे तर काही भागात पाऊस जोरदार बरसत आहे. चक्राकार वाऱ्यांमुळे कमी तापमानाचा पट्टा निर्माण झाला आहे. दरम्यान, आज विदर्भातील गोंदिया, यवतमाळ, अमरावती, भंडारा, नागपूर, अकोला, बुलढाणा, भंडारा, वाशिम, वर्धा या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील जनता सध्या हवामानातील चढ उताराचा अनुभव घेत आहे. मार्च महिन्यात रणरणतं ऊन होतं. पण शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला. सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला पण शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. हा अंदाजही खरा ठरला. या महिन्यात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे.
अशी परिस्थिती असताना राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार विदर्भातील जिल्ह्यांत आज दिवसभरात पाऊस कोसळणार आहे. अवकाळी पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. या पावसाने शेतातील पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यात अन्य ठिकाणी दमट आणि ढगाळ वातावरण राहील अशी शक्यता आहे.
मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्यात उष्णतेत वाढ होईल असेही हवामान विभागाने सांगितले होते. त्यानुसार या महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होत आहे. काही भागात तर तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचले आहे.
राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट! पुढील चार दिवस पावसाचे; ‘या’ जिल्ह्यांना मिळाला अलर्ट