Download App

विरोधकांनी आपले रंग दाखवले; मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलण्यास वेळ नाही -फडणवीस

मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीला विरोधी पक्षांना निमंत्रण दिलं पण ते आले नाहीत. त्यावरून त्यांनी रंग दाखवले अशी टीका फडणवीसांनी केली.

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. आज मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री बंगल्यावर सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातला. विरोधकांना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काही देणंघेणं नाही असा आरोप करत, ही बैठक सोडून विरोधक राजकीय बैठक घेत असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला. सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, आजची बैठक ही जातीय सलोखा राखण्यासाठी आयोजित केली होती. बैठकीला जे उपस्थित होते त्यांनी ज्या काही सुचना मांडल्या आहेत, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य ते निर्णय घेतील असंही ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

या बैठकीला मला वाटलं होतं की, शरद पवार तरी उपस्थित राहतील. मात्र, महाराष्ट्र पेटत राहावा आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजत राहावी, अशी विरोधी पक्षांची भूमिका आहे. मराठा आरक्षणाच्या महत्वाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली होती. मात्र, ऐनवेळी विरोधीपक्षाने, मविआने या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यांना मराठा आरक्षणासारख्या विषयासाठी वेळ नाही. मात्र, विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर राजकीय बैठक करायला वेळ आहे असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

महत्वाच्या विषयावर बैठक आयोजित केली होती. सर्वपक्षांना निमंत्रण दिलं होतं. सर्व येणार होते, पण राज्यात जे काही दोन समाजात वातावरण तयार झालं आहे. राज्य असंच पेटत राहावं, जातीय तेढ निर्माण राहावी, अशी मविआची भूमिका त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्पष्ट झाली आहे असा थेट आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. अशीच एक बैठक १ नोव्हेंबर २०२३ रोजी झाली होती. दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही. पण मविआला या दोन्ही समाजात संघर्ष आणि तेढ कायम राहावी आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यावी, ही त्यांची भूमिका समोर आली आहे असंही शिंदे यावेळी म्हणाले.

follow us