Download App

मराठवाड्यात पुढील तीन दिवस पाऊस कायम राहणार; वाचा, काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, वाऱ्याचा वेग अधिक असू शकतो. त्यामुळे मोठ्या झाडांच्या फांद्या तुटण्याची शक्यता आहे.

Marathwada Weather Update : सध्या मराठवाडा विभागात पुन्हा एकदा हवामानात बदल दिसून येत असून, पुढील काही दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (Weather) विशेषतः दिनांक २९ मेपासून पुढील तीन दिवसांपर्यंत, म्हणजे २९ ते ३१ मे या कालावधीत हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसामध्ये मेघगर्जना, विजा आणि वादळी वाऱ्यांचा समावेश असल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक ठरणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, वाऱ्याचा वेग अधिक असू शकतो. त्यामुळे मोठ्या झाडांच्या फांद्या तुटण्याची शक्यता आहे. यासोबतच वीज कोसळण्याच्या घटना होऊ शकतात तसेच वीजपुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विजेच्या तारा, खांबांपासून दूर राहणे, वीज चालू असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करणे आणि शक्यतो घराच्या सुरक्षित भागात राहणं गरजेचं आहे. वीज पडण्याचा धोका असताना उघड्यावर असलेल्या धातूच्या वस्तूंपासून दूर राहणं, तसंच मोबाईल किंवा इतर वायरलेस उपकरणांचा वापर टाळणं हेसुद्धा महत्त्वाचं आहे.

शेतकऱ्यांसाठी हा काळ अधिक जागरूकतेचा आहे. अनेक शेतकरी काढणीसाठी तयार असलेल्या पिकांच्या साठवणुकीची तयारी करत असतात. अशा वेळी हवामानातील अचानक बदल आणि पावसामुळे पीक सडण्याची, नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणूनच, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, उघड्यावर ठेवलेले धान्य किंवा इतर पीक संरक्षित ठिकाणी हलवावं. जर शक्य असेल तर शेतीशी संबंधित कामे पुढे ढकलावीत आणि हवामान स्थिर झाल्यानंतरच पुन्हा सुरू करावीत.

Water Grid : फडणवीसांचा वॉटर ग्रीड प्रकल्प दुष्काळ संपवणार अन् मराठवाडा सुजलाम  सुफलाम करणार

नागरिकांनी देखील आपल्या दैनंदिन व्यवहारात काळजी घणं अत्यंत गरजेचं आहे. वादळी वाऱ्याच्या वेळी घराच्या सुरक्षित भागात राहावं. शक्यतो बाहेर प्रवास टाळावा, आणि जर अत्यावश्यक असेल तर खबरदारी घेऊनच बाहेर पडावं. शहरांमध्ये रस्त्यांवर मोठी झाडं असल्यास त्यांच्या परिसरातून जाणं टाळावं, कारण वाऱ्यामुळे झाडे किंवा फांद्या कोसळण्याचा धोका संभवतो.

सध्या हवामान विभागाचे निरीक्षण हे संपूर्ण देशभरातील विविध विभागांवर केंद्रित आहे. पश्चिम भारतात मान्सूनचे आगमन सुलभ झालं असले तरी काही भागांमध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळेच मराठवाडा विभागात अशा प्रकारचा पाऊस आणि वीजांचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अशाप्रकारे पुढील तीन दिवस म्हणजेच २९, ३० आणि ३१ मे या काळात मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये हवामान अस्थिर राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना करणे हेच या काळात आवश्यक ठरणार आहे. योग्य खबरदारीने आपण जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळू शकतो.

follow us