सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना बीड पोलिसांची नोटीस; नेमकं काय घडलं?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आता बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

Anjali Damania

Anjali Damania

Anjali Damania : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण राज्यात चर्चेत आहेत. देशमुख यांच्या हत्येला तीन आठवडे उलटून गेले तरीही पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केलेली नाही. यामुळे जनमानसात असंतोषाची भावना आहे. या हत्येच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काल बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी या मोर्चात करण्यात आली. मात्र, या मोर्चाआधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धक्कादायक दावा केला होता. त्यांच्या याच दाव्यानंतर बीड पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.

‘त्या’ तीन आरोपींचा खून झालाय, त्यांचे मृतदेह.. मला फोन आला; दमानियांचा धक्कादायक दावा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करुन त्यांना बेदम मारहाण करून निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. तरी देखील मारेकऱ्यांना गजाआड करता आलेलं नाही. विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर देत या प्रकरणाची न्यायायलयीन आणि एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल असे सांगितले होते.

अंजली दमानियांचा दावा नेमका काय?

दमानिया म्हणाल्या रात्री साडे अकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान मला एक फोन आला. एका अनोळखी इसमाने आधी मला व्हॉट्सअप कॉल केले होते. परंतु, ते कॉल कनेक्ट झाले नाहीत. मग त्याने मला व्हॉईस मेसेज टाकले. त्यात त्यांनी तिन्ही आरोपींचा मर्डर झाल्याचं सांगतिलं. आता हे आरोपी पोलिसांना सापडणारच नाहीत. या घटनेची माहिती मी पोलिसांना दिली आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.

बीड पोलिसांच्या नोटीसीत काय

अंजली दमानिया यांनी फरार आरोपींच्या संदर्भात जो दावा केला होता त्याचे स्पष्टीकरण द्या अशा सूचना या नोटीसीद्वारे देण्यात आल्या आहेत. ज्या मोबाइल नंबरवरून व्हॉइस मेसेज आले होते. तो मोबाइल नंबर, व्हॉइस मेसेज आणि अन्य माहिती आणि पुरावे द्या असेही या नोटीसीत म्हटले आहे. आता या नोटीसीनंतर अंजली दमानिया काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

..तर बीडचं पालकत्त्व मी घेतलचं समजा; धनुभाऊंचे सगळे पत्ते बाहेर काढत संभाजीराजेंचा थेट इशारा

काय म्हणाल्या अंजली दमानिया

या नोटीसीनंतर अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. मी या प्रकाराची माहिती पोलीस अधीक्षकांना दिली होती. कदाचित मी दिलेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली नसेल. म्हणून त्यांचे पत्र काल मला मिळाले. पण माझ्याकडे असलेली सगळी माहिती मी त्याच वेळी एसपींना दिली होती. व्हॉइस मेसेज देखील पाठवले होते. पहिले दोन मेसेज डिलिट झाले आहेत त्याची माहिती देखील मी त्यांना दिली होती. पण आता हे पत्र पाहून मला आश्चर्य वाटलं. पण तरीही जर स्थानिक गुन्हे शाखेला ही माहिती पाहजे असेल तर मी माहिती देईन, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. याबाबत एबीपी माझाने वृत्त दिले आहे.

Exit mobile version