महानगरपालिकांमध्ये जशी जागावाटप आणि उमेदवारीवरून खडाजंगी झाली होती (Election) तशीच आता जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठीही दिसणार असं चित्र आहे. मनपात युती तोडून फटका बसल्याने आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेसाठी युती केली आहे. युतीची घोषणा झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांची गाडी रोखून धरत ‘युती तोडा’ अशा जोरदार घोषणा दिल्या.
वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करूनही आपली हक्काची जागा मित्रपक्षाला (शिंदेसेना) सोडल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला असून, या प्रकारामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेसाठी सिल्लोड वगळून भाजप २७ आणि शिंदेसेना २५ जागांवर लढणार असल्याची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी या गणिताला विरोध दर्शवला आहे. भाजप ‘मोठा भाऊ’ असूनही अनेक ठिकाणी सक्षम उमेदवारांना डावलले गेल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.
तुतारी को कैसा हराया?; मुंब्र्यात MIM चा विजय, आव्हाडांच्या पायाखालची जमीन सरकली का?
“आम्ही अनेक वर्षे पक्षाची संघटना बांधली, पण आता जागा दुसऱ्याला सोडल्याने आमचे अस्तित्व काय?” असा सवाल कार्यकर्त्यांनी मंत्री सावे यांच्यासमोर उपस्थित केला. महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. “महापालिकेत जसा चमत्कार घडवला, तसा जिल्हा परिषदेतही स्वबळावर निवडून येण्याची आमची ताकद आहे, मग युतीचे ओझे कशाला?” असा सूर कार्यकर्त्यांमध्ये आहे.
मनपा निवडणुकीच्या वेळीही तिकीट न मिळाल्याने भाजपत मोठा राडा झाला होता, त्या अनुभवावरून आता कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत. मंत्री अतुल सावे कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी कार्यकर्ते अधिक आक्रमक आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या या पवित्र्यामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली असून, छत्रपती संभाजीनगरचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
