Download App

व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने तयार केली अंधभक्तांची फौज; अजितदादा म्हणाले, सावध राहा !

Ajit Pawar : सध्या सगळीकडे व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचे पेव फुटले आहे. या विद्यापीठाने अंधभक्तांची फौजच तयार केली आहे. कोणतीही शहानिशा न करता फॉरवर्ड करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. यामुळे समाजाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा सावध राहा कोणतीही शहानिशा न करता मेसेज फॉरवर्ड करू नका, असा सल्ला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या शिक्षणसंस्थेच्यावतीने जालना येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राजेश टोपे उपस्थित होते.

वाचा : ‘हा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून…” अजित पवार संतापले; मुख्यमंत्री शिंदे धावत सभागृहात 

पवार पुढे म्हणाले, नुकतेच अधिवेशन पार पडले. राज्यातले प्रश्न होते. बेरोजगारीचा मोठा प्रश्न राज्यात आहे. महागाई कमी करा हा जनतेचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. न्याय कसा देता येईल याचा प्रयत्न केला. सभागृहात भूमिका मांडली, आंदोलने केली असे पवार म्हणाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, की आता नुसतेच ग्रॅज्युएट होऊन काहीच उपयोग नाही. कौशल्य विकासाचे अभ्यासक्रमांना प्रवेश घ्या.

ग्रामीण भागात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. जगात काय चाललय याचा कानोसा घेऊन वाटचाल करा. घरच्यांनी जो व्यवसयाय केला तोच करायचा हे डोक्यातून काढा. स्पर्धेत टिकायचे असेल तर संवाद शिका. नवनवीन कौशल्ये आत्मसात करा. नोकरीच्या बाजारात तुम्हाला चांगली संधी मिळेल.

Ajit Pawar : कृषिमंत्र्यांनी तारे तोडायला नको होते, अवकाळीचा मुद्द्यावरून अजित पवार संतापले

ज्ञान मिळवून त्याची सत्यता तपासा. संवाद घडवून आणण्याचे काम शिक्षकांनी करावे. पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा. करिअरसाठी अनेक क्षेत्र सध्या उपलब्ध आहेत त्यामुळे कृपा करून कोणी काही सांगितले तरी तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्राचाच स्वीकार करा, असे पवार म्हणाले.

आमच्या चिठ्ठीने काम होईल हे डोक्यातून काढा

वशिल्याचे दिवस आता संपले आहेत. त्यामुळे आमची चिठ्ठी नेली म्हणजे काम होईल हे आधी डोक्यातून काढून टाका. आज मेरिटलाच महत्व आहे. त्याशिवाय काहीच होत नाही. तेव्हा विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा कधीही विसर पडू देऊ नये. विद्यार्थ्यांचा कल शेतीकडे वाढतोय हे चांगले आहे.

तर वाटोळे झालेच  

प्रामाणिकपणे वागा नैतिक मुल्ये जपा. तुम्ही चांगले काम करायला लागले आणि मित्र जर चुकीचे असतील तर तुमचे वाटोळे झालेच समजा. त्यामुळे चांगले मित्र निवडा. व्यसन करू नका. श्रीमंत लोक काय वागतात याचा विचार करू नका. योग्य पद्धतीने वागा. कोणताही संवाद हा मन की बात असू नये तर तो जन की बात ऐकण्याची सवय ठेवा. लोकांचे पण म्हणणे तुम्ही ऐकले पाहिजे, असे पवार यावेळी म्हणाले.

Tags

follow us