Sanjay Gaikwad : शिवसेना आमदार संजय गायकवाड गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. त्यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चारही बाजून जोरदार टीका होताना दिसत आहे. तर दुसरीकडे आता त्यांच्या नावाने सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाला आहे. या पत्रात त्यांनी गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पत्राचा आणि माझा कुठलाही संबंध नाही अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.
कुठल्याही माध्यमातून गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली नाही. कुणीतरी पत्रक काढलेलं आहे मात्र त्या पत्रकाचा आणि माझा कुठलाही संंबंध नाही किंवा माझी सही किंवा माझ्या कुठल्याही पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची सही त्यावर नसल्याची प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिली आहे.
व्हायरल पत्रकात मागण्या काय?
महोदय,
माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना नम्र विनंती माझ्या वाचनात आलेले शिवाजी कोण होता हे तथाकथित पुस्तक महाराष्ट्राचे आणि अखंड हिंदुस्थानाचे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाचा एकेरी उपयोग करून त्यांच्या नावावर पुस्तक विक्री करून करोडो रुपये कमवणारा व लेखक यांच्या मृत्यूनंतर त्या बनावट पुस्तकाची छपाई करणारा प्रकाशक प्रशांत आंबी याला अटक करणे बाबत व तात्काळ प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या आयोगाद्वारे नुकसान भरपाई देणेबाबत.
1) शिवाजी कोण होता असे नाव देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उपयोग महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यासाठीच केला आहे.
2) शिवाजी कोण होता या पुस्तकाला भारत सरकार RNI या अधिकृत प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आयोगाची मंजुरी आहे का? असल्यास ती सादर करावी.
3) भारत सरकारचे शिवाजी कोण होता या टायटल असलेल्या पुस्तकाचे आर एन आय सर्टिफिकेट नवी दिल्ली भारत सरकार प्रसार व संचार संचालनालय यांचे सर्टिफिकेट आहे का ते हजर करावे नसल्यास या पुस्तकावर तात्काळ बंदी करणे.
4) शिवाजी कोण होता या नावाचे टायटल सेल म्हणजेच भारतीय प्रसार व प्रचार संचालनालय या खात्याचा प्राथमिक जिल्हाधिकाऱ्यांना असे पुस्तक छापण्याबाबत पत्र येते ते पत्र हजर करा नसल्यास या लेखकावर मरणोत्तर फौजदारी केस करावी.
5) प्रकाशक या व्यक्तीची बुद्धीची कीव करेल असे त्याची पुस्तक छापणारा मुद्रक म्हणजेच प्रिंटर याचे जिल्हाधिकाऱ्यांचे डिक्लेरेशन आहे का नसल्यास मुद्रकाला तात्काळ अटक करून त्याची प्रेस मशीन जप्त करावी.
6) कोणतेही वृत्तपत्र आणि पुस्तक छपाई करण्यास भारत सरकारची प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या अधिकृत आयोगाची मंजुरी लागते ती माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे आहे का हे पुस्तक ज्यावेळी छापले त्यावेळी ची जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आहे का नसल्यास या मुद्रकावर आणि प्रशांत आंबी या तथाकथित लेखकावर अटक करण्याची कारवाई करावी.
7) या पुस्तकाला भारत सरकार प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची मंजुरी जर नसेल तर या मुद्रकावर आणि वितरकावर आज पर्यंत किती पुस्तक खपवले याबद्दल फौजदारी दाव्यात दिवाणी दाव्यात उल्लेख करून त्यांची विक्रीची संपत्ती राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी.
8) शिवाजी कोण होता असे नाव छापणाऱ्या डीटीपी ऑपरेटर आणि या पुस्तकाची छपाई करणारी प्लेट तसेच पॉझिटिव्ह आणि वितरण करणारे पब्लिशर यांच्यावर फौजदारी व अटक करण्याची कारवाई तात्काळ व्हावी.
9) लेखक / प्रकाशकाला चीन व पाकिस्तान आधी देशातून त्याला फंडिंग आले आहे का तसेच त्याचा मोबाईल नंबर असलेला बॅकलॉग घेऊन हे पुस्तक छापण्यास कोणी मदत केली कोणत्या जिहाद्याने मदत केली याची सखोल सीआयडी चौकशी व्हावी व मरणोत्तर गोविंद पानसरे यांच्यावर केस करावी.
10) शिवाजी कोण होता या पुस्तकाची छपाई ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणची मालमत्ता व डीटीपी सॉफ्टवेअर जप्त करून डीटीपी ऑपरेटर यांना अटक करून त्यांना न्यायालय मार्फत समज द्यावा.
वरील सूचना मी आमदार संजय रामभाऊ गायकवाड आपणास विनंती करतो की वरील तथाकथित बनावट पुस्तक शिवाजी कोण होता याच्यावर तात्काळ कारवाई करून या मालक मुद्रक प्रकाशक यांच्यावर अटक वॉरंट जाहीर करून कोल्हापुरातील त्यांची मालमत्ता जप्त करावी ही नम्र विनंती.
आपला
(आमदार संजय रामभाऊ गायकवाड)
26 लाख लाडक्या बहिणींना धक्का, आता मिळणार नाही दरमहा 1500 ; कारण काय?
