Raj Thackeray On Chandrakant Patil : आम्ही लहान असताना आमचे आई-वडील रात्री झोपताना डोक्याला तेल लावायला सांगायचे. त्यामुळे बुद्धी तल्लख होते. पण, एका माणसाने आयुष्यभर तेल चोपटलं पण बुद्धी नाही आली. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री काय बोलतोय आपण, महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फूटप्रिंट, त्यांना फिंगरप्रिंट म्हणायचं होतं. ते आधार लिंक करणार, कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट बघायचेत असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा समाचार घेतला. ते मनसे विद्यार्थीसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलत आहेत. यावेळी राज ठाकरेंनी नुकतेच दिल्लीत झालेल्या आंदोलनावरून आणि मोदींच्या व्हिडिओवरही सडकून टीका केली.
कोल्हापूरकरांनी शिक्षणासाठी त्यांना पुण्यात पाठवलं पण…
Gen Z म्हणजेच 97 नंतर जन्माला आलेले 2011-12 पर्यंतची मुलं, ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पण आहेत. मुंबई-पुण्याचे, दिल्लीचे फक्त Gen Z नसतात किंवा नाहीत. या मुलांच्या अपेक्षा काय आहेत? आशा काय आहेत? यांना काय हवे? मला असं वाटतं ही गोष्ट समजून घेणे गरजेचं आहे. कोल्हापूरकरांनी शिक्षणासाठी त्यांना पुण्यात पाठवलं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. पण तिथेही काही झालं नाही. अशा व्यक्तीला राज्याचा शिक्षणमंत्री म्हटल्यावर आजच्या तरुणांचा आणि जनरेशन-Z चा संताप होणारच. राज्याच्या नशिबी अशी माणसं आली आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे,” अशी टीका त्यांनी केली.
दुसऱ्यांनाही आई असते, मोदींच्या व्हिडिओवरून सल्ला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याशी अंशतः सहमती दर्शवताना ट्रोल संस्कृतीवर निशाणा साधला. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा तिच्या कुटुंबीयांविषयी खालच्या दर्जाची भाषा वापरणे चुकीचेच असून, पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या या भूमिकेशी आपण पूर्णपणे सहमत असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, हा संदेश केवळ विरोधकांसाठी नव्हे, तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही आणि ट्रोल करणाऱ्यांनाही द्यायला हवा, असे राज ठाकरे म्हणाले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून ते आजच्या विरोधी नेत्यांपर्यंत अनेकांविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद भाषा वापरण्याची संस्कृती गेल्या काही वर्षांत वाढल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील अनेक कलाकारांनाही सोशल मीडियावर शिवीगाळ आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचे सांगत, “अशा ट्रोलर्सनाही पंतप्रधानांनी समज द्यावी. दुसऱ्यांनाही आई असते, याची जाणीव आपल्या पक्षातील लोकांनाही करून द्यावी,” असे ते म्हणाले.
यावेळी राज ठाकरे यांनी, “पंतप्रधान म्हणतात की मला आणि माझ्या आईला शिवीगाळ झाली, त्यांचा मुद्दा योग्य आहे. पण गेल्या १२ वर्षांत ज्या प्रकारची ट्रोल संस्कृती वाढीस लागली, त्याची जबाबदारीही सत्ताधाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे. जे पेरलं, तेच आता उगवलं आहे,” अशा शब्दांत टीकाही केली.
आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या आईवडिलांची कोण माफी मागणार
मोदी म्हणतात मुलं चुकीच्या रस्त्यावर भरकटले आहेत. मी ओशोचं वाक्य वाचलं होतं. कौन कहता है इस देश युवक गलत रास्ते पर भटक गया है. रास्ता बनाने वालो नेही गलत रास्ता बनाया है तो युवकों को क्यों टोकते हो. ते चुकीच्या रस्त्यावर नाही. त्यांच्या आशा आकांक्षा मारल्या जात आहेत. मोदी म्हणाले, ज्यांनी ट्रोल केलं, त्यांना माफ करतो. आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या आईवडिलांची कोण माफी मागणार. हे समजून घेतलं पाहिजे. विद्यार्थी तरुण तरुणींचं म्हणणं ऐकलं पाहिजे. विद्यार्थी हवालदिल होतो तो देवाकडे जातो. मला नोकरी लागू दे. काम मिळू दे. पैसे मिळू दे. त्याची स्वप्न असतात.
