मोठी बातमी : 20 तासांपासून एक्सप्रेस वे वर महाकोंडी; एसटी प्रशासनाचा सर्व बस रद्द करण्याचा निर्णय

Pune Mumbai Express Way Traffic पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन त्यामधून प्रोफोलीन गॅसची गळती सुरू झाली आहे.

मोठी बातमी! 20 तासांपासून एक्सप्रेस वे वर महाकोंडी; एसटी प्रशासनाचा बस रद्द करण्याचा निर्णय

मोठी बातमी! 20 तासांपासून एक्सप्रेस वे वर महाकोंडी; एसटी प्रशासनाचा बस रद्द करण्याचा निर्णय

Pune Mumbai Express Way Traffic Update : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर काल (दि.3) संध्याकाळी झालेल्या अपघातामुळे गेल्या 20 तासांपासून महाकोंडी निर्माण झाली आहे. अद्यापही ही वाहतूक सुरळीत होण्यास काही तासांचा कालावधी लागण्याची शक्यत असून, आता एसटी प्रशासनाकडून मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता अवजड वाहनांना तूर्तास फूड मॉल्स आणि महामार्गाच्या कडेला असलेल्या ‘ले-बाय’ मध्ये पार्क करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलं?

प्रोफोलीन हा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारा टँकर पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने आडोशी बोगद्याजवळ पलटी झाला. गळती होत असलेला गॅस हवेत वेगाने पसरत असल्यामुळे अग्निशमन दलाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज पुरवठा आणि वाहतूक थांबवली होती. ही गळती पूर्णपणे थांबवण्यासाठी तज्ज्ञांचे पथक आणि कंपनीचे इंजिनिअर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मुंबई-पुणे हायस्पीड रेल कॉरिडॉर; 170 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 48 मिनिटांत होणार

एसटीच्या किती बस फेऱ्या रद्द

अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यासाठी सध्या यंत्रणा युद्धपातळीवर काम केले जात असून, समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे मार्गावरील 33 ई-शिवनेरीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, मुंबईहुन पुणे मार्गे जाणाऱ्या पंढरपूर, पडोलशी, लातूर अशा 10 साध्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये 73 ई-शिवनेरी व 66 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली आहेत. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कळविले आहे.

पर्यायी मार्ग कोणते?

मार्गे ताम्हिणी घाट (कोकण मार्गे): पुणे → पौड → मुळशी → ताम्हिणी घाट → माणगाव → इंदापूर → पेण → मुंबई. (हा मार्ग थोडा लांबचा असला तरी विनाअडथळा प्रवास होईल).

मार्गे माळशेज घाट (कल्याण-ठाणे साठी): पुणे → चाकण → राजगुरुनगर → नारायणगाव → माळशेज घाट → मुरबाड → कल्याण/भिवंडी.

भीमाशंकर-मंचर मार्ग: उत्तर मुंबई किंवा पालघरला जाणाऱ्यांनी पुणे → मंचर → जुन्नर या मार्गे माळशेज घाटाकडे वळावे.

प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना

एसी (AC) वापरताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे तसेच गॅस गळती परिसरातून जाताना कारच्या काचा बंद ठेवण्याचे तसेच एसी इंटरनल एअर सर्कुलेशन मोडवर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय घाट आणि पर्यायी मार्गावर वाहतूक संथ असल्याने प्रवासाचा वेळ ३ ते ६ तासांनी वाढू शकतो. त्यामुळे पुरेसे इंधन गाडीत असल्याची खात्री करण्याचे सांगण्यात आले आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना सोबत पुरेसे पाणी आणि कोरडा खाऊ सोबत ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Exit mobile version