महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्ष अनुपस्थित राहिल्याने वेगळ्याचं चर्चेला तोंड फुटलं आहे. कालही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (22 फेब्रुवारी) महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला एकही नेता उपस्थित नसल्याने चर्चा रंगली आहे. पक्षामध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा रंगली असतानाच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनुपस्थितीमुळे संभ्रम आणखी वाढल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विरोधी पक्षाच्या बैठकीला न येणे महाविकास आघाडी संभ्रम वाढवणारे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मविआच्या बैठकीला येण्याची टाळाटाळ केली आहे का? अशी चर्चा सुरू आहे. मात्र, आमचा पक्ष महाविकास आघाडीसोबतच अधिवेशनात सोबत असणार अशी भूमिका पक्षातील नेत्यांनी मांडली आहे. आपण का येऊ शकलो नाही याची कारणं महाविकास आघाडीतील इतर पक्षाच्या नेत्यांना कळवली असल्याचे म्हटलं आहे.
ऊस दिसला नाही अन् दादांनी चेअरमनला फोन लावला; जयंत पाटलांनी सांगितला अजितदादांचा तो किस्सा
दरम्यान, विधिमंडळ सुरू होण्यापूर्वी आदल्या दिवशी विरोधकांची एकत्रित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रामुख्याने जयंत पाटील शशिकांत शिंदे जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतात. मात्र, काल समन्वयाच्या अभावामुळे महत्त्वाचे नेते अनुपस्थित राहिले. यांच्या अनुपस्थिती संदर्भात एबीपी माझाने कारणे जाणून घेतली असता साताऱ्यामध्ये एका विवाह सोहळ्यानिमित्त जयंत पाटील, शशिकांत शिंदे असल्याने जितेंद्र आव्हाड यांना महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला जाण्याचे पक्षाकडून सांगण्यात आले होते.
परंतु, जितेंद्र आव्हाड सुद्धा आपल्या वैयक्तिक कारणात व्यग्र असल्याने आणि आमदार रोहित पवार दिल्लीत असल्याने त्यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला दांडी मारली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकही नेता न आल्याने महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, बैठक सुरु झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचा काल सतेज पाटील यांच्या मोबाईल वरती फोन आला. तो फोन स्पीकरवर ठेवून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठवते अस त्यांनी सांगितलं. मात्र, बैठक आणि पत्रकार परिषद संपल्यानंतर माजी आमदार मिलींद कांबळे पोहचले. त्यानंतर त्यांनी पत्रावर सही केली.
