Download App

Budget session : साई संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरुन थोरात-फडणवीस आमने सामने

  • Written By: Last Updated:

मुंबई : अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या आणि अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या (Shirdi Sai Sansthan) 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे तसेच वेतनातील फरक त्वरित द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभेत केली आहे.

थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थान मधील सुमारे 598 कंत्राटी कर्मचारी साधारणपणे 20 ते 22 वर्षांपासून सेवेत आहे. मागील काळात 1052 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू केले मात्र हे 598 कर्मचारी त्या नियमांपासून वंचित राहिलेले असून अजूनही कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांनाही सेवेत कायम करण्याबाबत सरकारकडे साई संस्थानकडून वेळोवेळी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत, त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

टेक्सटाईल कमिश्नर कार्यालय दिल्लीला जाणार नाही तर कमिश्नरच जाणार; फडणवीसांचं उत्तर

साईबाबा संस्थान येथे 2000 पासून हे 598 कर्मचारी कंत्राटी पध्द्तीने तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहेत. या पगारावर त्यांचा घरखर्च तसेच मुलांचे शिक्षण होत पूर्ण नाही. गेल्या 20 वर्षांपासून हे कामगार अन्याय सोसत आहे. कायम सेवेतील कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपये वेतन मिळते तर कंत्राटी कामगारांना 10
हजार रुपयांवर काम करावे लागत आहे. सरकार याप्रश्नी सकारात्मक आहे असे म्हणत आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवत कायम करुन घ्यावे व ऑगस्ट 2009 पासून पूर्वलक्षी प्रभावाने वेतनाचा फरक देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, असेही थोरात म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या मागणीवर उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साईबाबा संस्थान येथे 635 कर्मचाऱ्यांना गेल्या काळात आपण कायम केले होते.आता आस्थापना खर्च 21% वर गेला आहे. अधिवेशन संपल्यानंतर याबाबत बैठक घेऊन उर्वरित कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.

Tags

follow us