आज राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर (Jankar) यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, हा मोर्चा काढू नये यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टींसह आंबा बागायतदार ऊत्पादक अध्यक्षांना मोर्चा न काढण्यासाठी पोलिसांकडून नोटीस जारी करण्यात आली होती, मात्र तरीही हा मोर्चा काढण्यात आला, त्यामुळे वर्षा बंगल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. मात्र आता हे आंदोलन चिघळलं आहे.
आज वर्षा बंगल्याच्या परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी महादेव जानकर यांना पोलिसांनी उचलबांगडी करून नेलं. प्रमुख नेते ताब्यात घेतल्यामुळे आता हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांना इशारा
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले की, गेल्या अडीच महिन्यांपासून कोकणातील शेतकरी आंदोलन करत असताना मुख्यमंत्री चार-पाच वेळा कोकणात आले. कोणाच्या वाढदिवसाला आले, कोणाच्या लग्नाला आले आणि काही खासगी कामासाठी आले, पण अडीच महिन्यांत सातत्याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर काय त्यांचं म्हणणं आहे? शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तपासलं असतं, पण साधं निवेदन घेण्याची सुद्धा त्यांनी तसदी घेतली नाही. कोकणातील शेतकरी 50 वर्षांत पहिल्यांदा मुंबईत आला होता. मुख्यमंत्र्यांनी पोलीस खाक्या दाखवला, याचा आम्ही धिक्कार करतो आणि याची किंमत निश्चितच मुख्यमंत्र्यांना चुकवावी लागेल, असा इशारा दिला.
