Download App

राज ठाकरेंनी सांगितला व्याख्यान-भाषणातला फरक, राज्यपालांनाही प्रत्युत्तर

पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात राज ठाकरे यांनी बुधवारी सहजीवन व्याख्यानमालेत व्याख्यान दिलं, ‘नवं काहीतरी’ असा त्यांच्या व्याख्यानमालेचा विषय होता. यावेळी त्यांनी व्याख्यान आणि भाषणात फरक काय असतो याबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, आजपर्यंत आपण अनेकदा मोठ्या ठिकाणी भाषणं केली. सभा घेतल्या मात्र व्याख्यानमालेत आणि भाषणात फरक काय असतो ते सांगतो. व्याख्यानात जरा शांत भाषेत बोलावं लागतं तर भाषणात टीका करावी लागते. आज व्याख्यान करणार आहे. त्यामुळं व्याख्यानात जसं बोललं जातं त्याप्रमाणचं बोलणार आहे, असंही ते म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले की, गुजरात आणि बिहारचे लोक महाराष्ट्राबाहेर गेले तर मुंबईत काहीच उरणार नाही, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते. पण त्याच राज्यातील लोकांना कामधंद्यासाठी महाराष्ट्रात यावं लागतंय. त्यांना महाराष्ट्रानं मोठं केल्याचं सांगत त्यांनी राज्यपालांना प्रत्युत्तर दिलंय.

राज ठाकरेंनी उदाहरण देताना सांगितलं की, अमिताभ बच्चन जर त्यांच्या शहरातून मुंबईत आले नसते तर आज आपल्याला ते माहित देखील नसते. त्यांनादेखील महाराष्ट्रानं ओळख दिली आहे, असेही ते म्हणाले. सध्याचं राजकारण बदलत आहे. विधानसभेतील कोणतेही भाषणं ऐकायची इच्छा होत नाही. यामुळं मूळ प्रश्न मागे पडतात आणि एकमेकांवर टीका केली जाते.

आपल्यातील अनेकांनी मूळ प्रश्न विचारायचा हवेत. त्यामुळं जास्तीत जास्त संख्येनं तरुणांनी राजकारणात सहभागी व्हावं. त्यांच्यामुळं महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असंही ते म्हणाले. अशा बदलत्या राजकारणामुळं तरुणाई दुरावली आहे, त्यामुळं ही पीढी परदेशात जात आहे. अनेक परदेशी कंपन्यांनी भारताला डंम्पिंग ग्राउंड बनवल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

Tags

follow us