Rajan Patil Exclusive Interview : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजन पाटील यांची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. राजन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उज्जवला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यांचा अर्ज बाद झाल्याने अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे यांनी उत्साहाच्या भरात आव्हान दिले होते. यानंतर राजन पाटील यांनी अजित पवार यांची माफी मागितली होती. या घटनाच्या पार्श्वभूमीवर आता माजी आमदार राजन पाटील यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये राजन पाटील यांनी अनेक खुलासे करत शरद पवार यांची साथ का सोडली यावर देखील मोठा खुलासा केला आहे.
लेट्सअप मराठीला (Letsupp Marathi) दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये राजन पाटील म्हणाले की, स्वतःच्या राजकीय महत्वकांक्षापेक्षा त्या भागातील जनतेचं स्वार्थ आधी बघितला पाहिजे. माझा जो जिल्हापरिषदेचा मतदारसंघ होता तो आज देखील पाण्यापासून वंचित होता तिथे पाणी आणून देतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शब्द दिला होता म्हणून माझ्या स्वार्थाकरता नाही तर माझ्या लोकांच्या भल्यासाठी मला शरद पवारांची साथ सोडावी लागली असा खुलासा माजी आमदार राजन पाटील यांनी लेट्सअप मराठीला (Rajan Patil Exclusive Interview) दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCPSP) गट सोडताना मी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि तत्कालीन अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना देखील माहिती दिली होती असं देखील या मुलाखतीमध्ये राजन पाटील म्हणाले.
तर शरद पवारसाहेब सर्वांना एकत्र घेऊन चालणारे आहे मात्र अजित पवारांचं तसं नाही. अजित पवार फक्त एकालाच धरुन असतात दुसऱ्याकडे बघत देखील नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत आमचं जास्त काळ जमलं नाही. आमचा आमदार पाडण्यामागे ज्याचा हात होता त्यांना प्रमोशन देण्यात आले त्यामुळे ज्या ठिकाणी आपला स्वाभिमान नाही, ज्या ठिकाणी आपल्याला किंमत नाही, निष्ठतेची कदर नाही तिथं राहण हे कितपत योग्य आहे?
तर दुसरीकडे ज्या भाजपला आम्ही विरोध केला त्या भाजपने आम्हाला 2022 पासून पक्षात प्रवेश देण्याची तयारी केली होती असा खुलासा देखील राजन पाटील यांनी या मुलाखतीमध्ये केला. तसेच वायनरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही मदत केली नाही अशी देखील माहिती राजन पाटील यांनी दिली.
