Download App

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर

Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ एका प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा समृद्धी महामार्गावरील हा सर्वात मोठा अपघात आहे. ही बस नागपूरवरुन (Nagpur) पुण्याकडे (Mumbai) निघाली होती. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हे 8 जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर सिंदखेडराजा येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये बसने पेट घेतल्यानं 26 जणांचा मृत्यू झाला आहे. आपण या अपघाताबद्दल जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत.

Breaking : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी बसला आग लागून 26 प्रवाशांचा मृत्यू

याशिवाय अपघातामधील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

26 जणांचा जीव घेणारा अपघात कसा घडला? वाचलेल्या प्रवाशांनी सांगितला शहारे आणणारा घटनाक्रम

त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल.
जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली, अशीही माहिती फडणवीस यांनी दिली.

Tags

follow us