अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील (Nagar) सौंदाळा गावच्या सरपंचाने चक्क स्वतःच्या हयातीतच स्वतःचे ‘पिंडदान’आणि ‘दहाव्याचा’ विधी उरकला आहे. जिवंतपणीच कावळा शिवल्याची चर्चा पंचक्रोशित होत असून 21 एप्रिल रोजी सरपंच शरद आरगडे, त्यांच्या पत्नी आणि मुलाने या आगळ्यावेगळ्या विधीमध्ये सहभाग घेत समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे.
हिंदू धर्मात व्यक्तीच्या निधनानंतर 10 व्या दिवशी पिंडदान आणि उत्तरकार्य करण्याची प्रथा आहे. मात्र, “मेल्यानंतर कोणी काय केले हे पाहायला मी जिवंत असणार नाही, मग जे काही करायचे आहे ते डोळ्यादेखत का नको?” असा विचार करून आरगडे यांनी हा निर्णय घेतला. शरद आरगडे यांनी घेतलेल्या निर्णयाचे त्यांच्या कुटुंबीयांनी देखील स्वागत केले असून, या कार्यक्रमात त्यांच्या पत्नी आणि मुलाने शास्त्रोक्त पद्धतीने विधी करत जिवंतपणीच त्यांचे पिंडदान केले.
विशेष म्हणजे या विधीवेळी अनेक कावळ्यांनीही पिंडाला स्पर्श केल्याने उपस्थितांच्या डोळ्यांत अंजन पडले. “या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद आरगडे यांनी समाजातील काही अनिष्ट रूढींवर बोट ठेवले आहे. मृत्यूनंतरचा अवाजवी खर्च, माणूस जिवंत असताना त्याच्या गरजांकडे दुर्लक्ष करणे आणि मेल्यानंतर मात्र समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून विधी करणे, याला त्यांनी विरोध दर्शवला आहे.
तनपुरे, रोहित पवारांची सुटका कोर्टाच्या एका निकालानं विरोधकांच्या हातून सूडाचं मोठं शस्त्र गेलं!
अंधश्रद्धेचे निर्मूलन मृत्यूनंतर आत्मा शांत होतो किंवा ठराविक विधी केल्यानेच गती मिळते,यांसारख्या समजुतींना फाटा देत त्यांनी विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन सौंदाळा गावच्या सरपंचांनी केले आहे. सामाजिक प्रबोधन, भावनांच्या नावाने होणारी कुटुंबाची आर्थिक पिळवणूक थांबली पाहिजे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या अनोख्या ‘दहाव्याच्या’ कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे.
विचारवंतांकडून आरगडे यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. जिवंतपणी स्वतःचे पिंडदान करून त्यांनी केवळ मृत्यूचे भय घालवले नाही, तर समाजातील कालबाह्य परंपरांना एक प्रकारे ‘मूठमाती’ देण्याचे काम केले आहे. केवळ पिंडदान करून न थांबता, शरद आरगडे यांनी समाजात स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवरही प्रहार केला आहे.
माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत, तिने कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र उतरवू नये, अस स्पष्ट नमूद करणारे कायदेशीर प्रतिज्ञापत्र देखील त्यांनी तयार केले आहे. दरम्यान, या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, त्यांच्या मृत्यूनंतर कोणतेही सुतक पाळले जाऊ नये किंवा धार्मिक कर्मकांड करू नये.
पतीच्या निधनानंतर पत्नीला सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार असून, समाजातील जाचक रूढींनी तिला अडकवू नये, हा क्रांतिकारी विचार त्यांनी या माध्यमातून मांडला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्त्री सन्मानाचा एक नवा पायंडा पडताना दिसत आहे.
