Sharad Pawar On Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आले असून या निवडणुकीत 243 पैकी 202 जागांवर एनडीएने बाजी मारली आहे तर फक्त 35 जागांवर महाआघाडीला विजय मिळवता आला आहे. तर आता बिहारमध्ये महाआघाडीचा पराभव का झाला यावर देशाचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
बिहारमध्ये महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. निवडणुकीच्यापूर्वी एनडीएनने लाडकी बहीण सारखी योजना आणत महिलांच्या खात्यात 10-10 हजार रुपये जमा केल्या होत्या.
माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीचं मतदान झालं त्यानंतर मी काही लोकांशी बोललो. त्यांच्याकडून मला अशी माहिती मिळाली की बिहारच्या निवडणुकीत (Bihar Election 2025) मतदान महिलांनी हातामध्ये घेतलं होतं. एक अशी शंका होती, ज्या अर्थी महिलांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग घेतला याचा अर्थ महिलांना त्यांच्या खात्यात 10 हजार रुपये देण्याच्या योजनेचा हा परिणाम असावा असं माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले.
माध्यमांशी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात देखील निवडणुकीच्या आधी अधिकृत पैसे वाटले म्हणजे प्रत्येक मताला पैसे देतात तसे नाही, तर सरकारच्यावतीने योजनेच्या माध्यमातून पैसे दिले म्हणजे लाडकी बहीण योजना. आता प्रश्न असा आहे की यापुढील निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांनी मतदानाच्या आधी अशा प्रकारे पैशांचं वाटप करुन निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका घेतली तर निवडणुकीच्या प्रक्रियेवरील लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचं वाटप करणं हे योग्य आहे का? याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत असं देखील यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.
बिहारमध्ये 16 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, अजित पवार म्हणाले, न सांगता उमेदवार दिले अन्…
एनडीएची जबरदस्त कामगिरी
तर दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वांना धक्का देत एनडीएने जबरदस्त कामगिरी केली. भाजपने 89 तर जेडीयूने 85 जागांवर विजय मिळवला आहे. याचबरोबर एनडीएमधील इतर घटक पक्षांनी देखील शानदार कामगिरी केल्याने एनडीएने 243 पैकी तब्बल 202 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाआघाडीला मोठा धक्का बसला असून त्यांना फक्त 35 जागांवर निडणुकीय यश मिळाले आणि एमआयएमने पुन्हा एकदा पाच जागांवर बाजी मारली.
