Shiv Sena Split : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा राजकीय धक्का दिला आहे. ऑपरेशन टायगर राबवत शिंदे यांनी ठाकरेंचे सहा खासदार फोडल्याने राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरेंच्या सहा खासदारांनी आता वेगळा गट स्थापन करुन शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकाडून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा खासदारांना देण्यात येत आहे. त्यामुळे हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात कधी प्रवेश करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन
आज शिवसेना पक्षाचा 60 वा वर्धापन दिन असल्याने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात ठाकरे गटाचे सहाही खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
तर दुसरीकडे आज या खासदारांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार नसल्याची माहिती देखील समोर येत आहे. 21 जूननंतर ठाकरे गटातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. ठाकरेंच्या सहाही खासदारांनी स्वतंत्र गटाची स्थापना केली असून या गटाला आतापर्यंत कायदेशीर मान्यता मिळाली नसल्याने पक्ष प्रवेश सोहळा आज होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. जर खासदार स्वतंत्र गटाला मान्यता मिळण्यापूर्वी अन्य पक्षाच्या व्यासपीठावर गेले तर त्यांची खासदारकी अपात्र ठरु शकते म्हणून सध्या पक्ष प्रवेश होणार नाही.
ठाकरेंची साथ सोडणारे खासदार कोण?
धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर, परभणीचे संजय जाधव, यवतमाळ वाशीमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, मुंबई उत्तर पूर्वचे संजय दिना पाटील आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत वेगळा गट स्थापन केला असून लवकरच हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे काय बोलणार?
शिवसेना पक्षाचा आज 60 वा वर्धापन दिन असल्याने आज ठाकरे गटाकडून षण्मुखानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
