Download App

‘गुवाहाटीत असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन…, मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘त्या’ फोनकॉलचा किस्सा !

जालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी शिवसेनेत बंड केलं. ५० आमदारांना घेऊन त्यांनी गुवाहाटीची (Guwahati) वाट धरली. या बंडामागे भाजपचा हात असल्याचं उघडही झालं होतं. जालना जिल्ह्यात सलाम किसान आणि वरद क्रॉप सायन्स यांच्यातर्फे शेतकरी (farmers) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जलतारा- जलसंधारणातून ग्रामसमृध्दीकडे ही या शेतकरी मेळाव्याची संकल्पना आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) पहिल्यांदा एका व्यासपीठावर एकत्र आले.

यावेळी मुख्यमंत्री यांनी श्री श्री रविशंकर यांचे तोंडभरून कौतुक करत ते म्हणाले, आम्ही गुंतवणूक आणण्याकरिता डाव्होसला गेलो. तिथे गेल्यावर गुरुदेव आम्हाला भेटले. डाव्होसमध्ये आम्ही १ लाख ४० हजार कोटींचे करार केले. ते आणण्याचे काम आम्ही प्रत्यक्षात करुच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता राज्य सरकारच्या माध्यमातून ६ महिन्यात अनेक मोठे निर्णय घेतले. यातील कोणताही निर्णय आमच्या वैयक्तिक लाभाचा नाही. जनतेसाठीचे सर्व निर्णय घेतले.

महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. आज या भूमीत श्री श्री रविशंकर आले आहेत. त्यांचे आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळणार आहे. जेव्हा आम्ही गुवाहाटीला होतो, श्री श्री रविशंकर यांनी मला फोन करुन आशीर्वाद दिला होता. आम्ही त्यांना सांगितले की, ही जी लढाई सुरु केली. तुम्ही चांगले काम करत आहात. तुम्हाला यश मिळणार, गुरुदेव चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे असतात. तो कार्यक्रम त्यावेळी झाला म्हणूनच आज हा कार्यक्रम पार पडत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना सुरु केली. त्याचा फायदा राज्यात झाला. दुर्दैवाने मागील अडीच वर्षांमध्ये ही योजना बंद करण्यात आली होती. ही एक आदर्श योजना होती. आमचे सरकार आल्यावर आम्ही पहिला निर्णय जलयुक्त शिवार योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. जलतारा प्रकल्पाला देखील आम्ही सरकारतर्फे मदत देत आहोत आणि ही योजना पुढे घेऊन जाण्याकरिता प्रयत्न करु, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. देशातील एक लाख गावांमध्ये हा जलतारा प्रकल्प राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्याला आपण सर्व मिळून साथ देऊया. शेती आणि शेतकऱ्याला जे जे द्यावे लागेल, त्यासाठी सरकार मागे राहणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

Tags

follow us