Download App

बीड, नगर, सातारा मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांना ताकद : शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य सरकारने बीड, अहमदनगर, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या सात जिल्ह्यांमधील एकूण 13 साखर कारखान्यांना एक हजार 898 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या 13 कारखान्यांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नेत्यांच्या 12 आणि एका काँग्रेस नेत्याच्या कारखान्याचा समावेश असल्याने सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.

राज्य सरकार स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हे कर्ज घेऊन ते या 13 कारखान्यांना देणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली होती. (state government has decided to provide loans worth 1 thousand 898 crores to 13 sugar mills.)

Lok Sabha Election : महाराष्ट्राची वाट खडतर! फाटाफुटीने अवघड केला निवडणुकीचा पेपर

सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी राज्य शासनाकडे कर्जहमीचे प्रस्ताव पाठविले होते. यात वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 नेत्यांच्या आणि फक्त एका काँग्रेस नेत्यांशी संबंधित साखर कारखान्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

कोणत्या साखर कारखान्यांना झाला लाभ?

बीड जिल्हा :

लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना – 104 कोटी (राष्ट्रवादी काँग्रेस)

अंबाजोगाई – 80 कोटी (राष्ट्रवादी काँग्रेस)

अहमदनगर :

लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना – 150 कोटी (राष्ट्रवादी काँग्रेस)

अगस्ती – 100 कोटी (राष्ट्रवादी काँग्रेस)

शिवाजीराव नागवडे – 110 कोटी (राष्ट्रवादी काँग्रेस)

वृद्धेश्वर – 99 कोटी (भाजप)

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे – 125 कोटी (भाजप)

धाराशिव :

विठ्ठलसाई – 100 कोटी (भाजप)

लेट्सअप विश्लेषण : ‘कमळा’ला का पडली ‘इंजिना’ची गरज; ही आहेत ‘हायलाईटेड’ 5 कारणं

सातारा :

किसनवीर – 350 कोटी (राष्ट्रवादी काँग्रेस)

किसनवीर (खंडाळा) – 150 कोटी (राष्ट्रवादी काँग्रेस)

कोल्हापूर :

तात्यासाहेब कोरे वारणानगर – 350 कोटी (भाजप)

सोलापूर :

संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा – 100 कोटी (भाजप)

बारामतीमध्ये अजितदादांची ‘साखरपेरणी’ : संग्राम थोपटेंसाठी मोठा डाव :

राज्य शासनाकडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच कृपादृष्टी झालेल्या एका काँग्रेस नेत्याचे नाव म्हणजे भोर, वेल्हा, मुळशी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे. थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्यास राज्य शासनाकडून 80 कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे. या माध्यमातून थोपटे यांना खूश करुन त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी त्यांची मदत घेण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा डाव असल्याचे बोलले जात आहे.

यंदा बारामती जिंकायचीच, सुप्रिया सुळे यांचा पराभव करुन शरद पवार यांना चितपट करायचेच असा जणू चंग भाजपने आणि अजित पवार यांनी बांधला आहे. त्यासाठी अजितदादांनी मतदारसंघात जातीने लक्ष घातले आहे. मतदारसंघातील समीकरणे साधण्यावर ते भर देत आहेत. यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलही त्यांना मदत करत आहेत. दौंड, इंदापूर, पुरंदर इथले वाद मिटविण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. अशात आता भोर, वेल्हा, मुळशी या तीन तालुक्यांमध्ये पसरलेल्या मतदारसंघातील टेन्शन कमी करण्यासाठी अजितदादांनी ‘साखर पेरणी’ला सुरुवात केली आहे.

follow us