मुंबईसह संपूर्ण राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मंत्रालयातील परिवहन विभागाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे. यामध्ये 1 मे 2026 म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून मुंबईतील ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय लागू होणार होता तो पुढं ढकलण्यात आला आहे.
परमिट किंवा लायसन्स रद्द होणार नाही
कोणाचंही लायसन्स किंवा परमिट सध्या रद्द केले जाणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हजारो रिक्षाचालकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठी भाषा येत नसल्यास रिक्षाचालकांचे परवाने (Permit) किंवा लायसन्स रद्द केले जातील, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र, परिवहन विभागाच्या बैठकीत यावर स्पष्टता देण्यात आली आहे.
१५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ?
रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणि आवश्यक तयारी करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. म्हणजेच, १५ ऑगस्टपर्यंत कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केली जाणार नाही. हा निर्णय रिक्षाचालकांच्या संघटनांनी केलेल्या मागणीचा आणि संपाच्या इशाऱ्याचा विचार करून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
