Download App

Uddhav Thackeray : ‘गुजरातचा माल महाराष्ट्रात, नशेबाजीचं कारस्थान उधळावच लागेल’; ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeary : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार आणि ठाकरे गटात जोरदार वाक् युद्ध सुरू आहे. ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज पुन्हा एकदा सरकारवर विखारी टीका केली आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल कुत्ता गोलीप्रमाणे चढला आहे. मिळेल त्या मार्गाने पैसा ओढायचा. मग तो नशेच्या व्यापाराचा का असेना. इथपर्यंत सरकारच्या नितीमत्तेची घसरण झाली आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाने सरकारच्या कारभाराचा पंचनामा सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

ससून इस्पितळात एक ड्रग्ज माफिया मंत्र्यांच्या आशिर्वादाने नऊ महिने पाहुणचार घेतो व एक दिवस पसार होतो. बोभाटा झाल्यावर तो पकडला जातो. पकडलेला ललित पाटील तोंडावरील बुरख्याआडून मला पळविण्यात आले असे सांगतो. मिंधे सरकार व त्यांच्या गृहमंत्र्यांची ही लक्तरे आहेत. गुजरात हे ड्रग्ज माफियांचे आंतरराष्ट्रीय आगार बनले आहे. गुजरातचा माल महाराष्ट्रात येत आहे. महाराष्ट्राला नशेबाज करण्याचे कारस्थान उधळून लावावेच लागेल.

Lok Sabha Election : शरद पवारांचे शिलेदार करणार विखेंची कोंडी; नगरसाठी राष्ट्रवादीचा मोठ्ठा ‘डाव’

पोलीस अधिकाऱ्यांनाही मिंधे करून टाकले 

ललित पाटीलचे ससूनमधून पलायन व आता त्याची अटक हे एक फिक्सिंग असून यामागे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील शिंदे गटाचे दोन मंत्री असल्याचा आरोप काँग्रेसचे नाना पटोले, रवींद्र धंगेकर यांनी केला. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून गुंड, माफियांना मदत व्हावी यासाठी पोलीस व तुरुंग प्रशासनात हस्तक्षेप केला जातो. निवडणुकीपूर्वी 302 च्या अनेक गुन्हेगारांना मुक्त करून त्यांचा वापर राजकारणात केला जाईल व त्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. पोलिसांचा वचक राज्यात राहिलेला नाही. कारण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही मिंधे किंवा घरगडी करून ठेवले आहे. नागपुरात गृहमंत्र्यांच्या घराच्या उंबरठ्यावर भाजपाच्या युवा पदाधिकाऱ्याने पोलीस उपायुक्तांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली तरी राज्याचे पोलीस महासंचालक, नागपुरचे मिंधे पोलीस कमिश्नर डोळ्यांवर कातडे ओढून बसले, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे.

नशेच्या विळख्यात अनेक शहरे,  पिढीच होतेय उद्धवस्त 

नशेच्या व्यापाऱ्यांना राजाश्रय मिळू लागल्याने राज्याची अवस्था उडत्या पंजाबसारखी होईल काय, असे जनतेला वाटू लागले आहे. बाजूच्या गुजरात राज्यातील बंदरे, विमानतळांवर हजारो कोटींचे अंमली पदार्थ पकडले जात आहेत. जो माल पकडला गेला नाही त्याला पाय फुटून तो महाराष्ट्रात येतो. महाराष्ट्रातील अनेक शहरे व जिल्हे नशेच्या विळख्यात सापडली आहेत व नशेचे समृद्धी ठेकेदार बिनधास्त एक पिढी उद्धवस्त करत आहेत, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

Maharashtra Politics : ‘त्या’ याचिकांचं काय होणार? आज महत्वाची सुनावणी

follow us