Download App

नांदेड : 46 मृत्यू, डीनवर मनुष्यवधाचा गुन्हा अन् केंद्रीय मंत्र्यांची रुग्णालयाला क्लीनचिट!

नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील मृतांची संख्या 46 वर गेली आहे. अपुऱ्या सुविधा आणि औषध टंचाईमुळे हे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर राज्य सरकारकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशात आता रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे (Dr. S. R. Wakode) यांच्यासह प्रसुती विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 304 आणि 34 अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Nanded Hospital Deaths FIR Registered Against Dean & Delivery Department Doctor )

मात्र त्याचवेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रुग्णालयाला क्लीनचिट दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाचा अहवाल केंद्राला प्राप्त झाला आहे. यानुसार औषध साठा पुरेसा होता, औषध नसल्याने मृत्यू झालेले नाहीत. मृत्यू झालेल्या काही रुग्णांचं वय जास्त होतं. यात अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयातून दाखल झाले होते. काही नवजात बालक खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती प्राथमिक अहवालात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. दुसरा सविस्तर अहवालही लवकर येईल, असेही त्यांनी सांगितले. (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar gave clean chit to Nanded Government Hospital)

भाजपने गमावला आणखी एक मित्र; मोदी-शाहंची ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम स्वप्नवतच राहणार

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनीही औषध टंचाईचा दावा फेटाळला :

नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणानंतर राज्याचे वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी रुग्णालयाला भेट दिली होती. ‘‘या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन डॉक्टरांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. तसंच वर्ग-3 व वर्ग-4ची पदे ऑक्टोबरअखेर भरली जातील, पायाभूत सुविधांसह अन्य सुविधा देण्यासाठीही शासन प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

500 रुग्णांची क्षमता असताना या रुग्णालयात 700 ते 800 रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचा जास्त समावेश आहे. हाफकीन संस्थेने वेळेवर औषधी पुरवठा केला नाही, ही बाब सत्य आहे. पण कोणत्याही औषधींचा तुटवडा नाही. जर औषधे बाहेरून आणायला लावली जात असतील, तर त्याही बाबींची चौकशी केली जाईल, असे मुश्रीफ म्हणाले.

पक्षातील लोकं का गेली हे पवार साहेबांना चांगलंच ठाऊक; फडणवीसांनीही दिलं करेक्ट उत्तर

सरकारी दवाखान्यात औषधांची प्रचंड टंचाई

दरम्यान, अधिष्ठाता एस. आर. वाकोडे यांनी राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांची प्रचंड टंचाई आहे, अशी कबुली दिली होती. हाफकीनकडून औषधांची खरेदी बंद केली आहे. काही काळात हाफकीनकडून औषधांची खरेदी होणार होती, ती झालेली नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषध पुरवठा होत नाही. औषध खरेदीसाठी पैशांची जितकी तरतूद आहे ती कमी पडते अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.

Tags

follow us