Download App

बुलढाण्यातील ‘शासन आपल्या दारी’ला फडणवीस-पवार का नाही आले? सीएम शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण…

  • Written By: Last Updated:

Shasan Tumchaya Dari : बुलढाण्यात आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अन्य काही मंत्री उपस्थित होते. मात्र, दोन्ही उपमुख्यमंत्री हे या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. कार्यक्रम पत्रिकेत नाव असूनही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलं. जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणामुळं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला येणं टाळलं असावं, असं बोलल्या जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी या चर्चांना विराम दिला.

महाराष्ट्रात सध्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जोरात सुरू आहे. आमदार संजय गायकवाड यांचा मतदारसंघ असलेल्या बुलढाणा येथे आज ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, या कार्यक्रमाला फडणवीस आणि पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित नव्हते, असे आता काही लोक सुरू करतील. पण खरी गोष्ट ही आहे की, देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित दौरा होता.

फडणवीसांचा नियोजित दौरा होता, त्यामुळेच ते सध्या लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहे. तिथं भारतीय सैन्याचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी ते तिथं गेले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते या दौऱ्यावर आले नाहीत.

Jalna Maratha Protest : मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं… 

ते म्हणाले की, सरकारमधील दोन्ही उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित नसल्याचं सांगत लोक आता काहीही सांगतील. मात्र, आमचे सरकार फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे, सरकार घट्ट आहे, या सरकारला कुठंही अडचण नाही, असंही शिंदे म्हणाले.

दरम्यान, परवा जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्ते आणि त्यांच्या समर्थकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे मराठवाड्यात जनक्षोभ निर्माण झाला. फडणवीस हे गृहमंत्री असल्यानं या लाठीचार्जला त्यांना जबाबदार धरलं जातंय. राज्यातील चिघळलेली परिस्थिती पाहता फडणवीस यांनी बुलढाण्याला जाणे टाळले असावे, असे बोललं जात आहे. अजित पवारही गैरहजर राहिले. बहुधा वातावरण आणखी चिघळू नये, यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमापासून दूर राहणं पसंत केलं असावं, अशी चर्चा सुरू आहे.

Tags

follow us