अहमदनगर : आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर भाजपने अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात चांगलाच जोर लावला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या निवडी पार पडल्या होत्या. त्यानंतर आता आज (24 सप्टेंबर) स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी महाविजय २०२४ संवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांनी शक्तिप्रदर्शन करत दौऱ्याची सुरुवात केली. (BJP state president Chandrashekhar Bawankule has come on a visit to Ahmednagar district)
घर चलो अभियान, महाविजय २०२४ संवाद यात्रा अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपने आज सकाळी शहरात शक्तिप्रदर्शन केलं. त्यानंतर आज दिवसभर ते नगरमध्ये असणार असून शहरासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या २ कार्यशाळा घेणार आहेत. यातील राहुरी, अहमदनगर, शेवगाव-पाथर्डी, पारनेर विधानसभा मतदारसंघातील पहिली कार्यशाळा, तर श्रीगोंदा आणि कर्जत – जामखेड या मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची दुसरी कार्यशाळा पार पडणार आहे.
दरम्यान, अहमदनगरमधील शहर आणि पारनेर हे मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आहेत. मात्र या शहर मतदारसंघात आज भाजपने शक्तिप्रदर्शन करत आपला दावा भक्कम केला आहे. नगर शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे आहेत. मात्र भाजपकडून माजी नगराध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. अभय आगरकर यांच्या नावाची चर्चा आहे. नुकतीच त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणूनही निवड झाली आहे. 2014 मध्येही त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती. पंरतु, त्यांचा निसटता पराभव झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून पाथर्डीआणि शेवगाव तालुक्यातील अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद सुरु आहेत. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या निवडीमुळे आमदार मोनिका राजळे यांच्यावर नाराज आहे. यातून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. सध्या या नियुक्तीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थगिती दिली आहे.
मात्र या वादावर बोलताना बावनकुळे म्हणाले, मला वाटतं पक्षामध्ये लोकशाही आहे. पक्षामध्ये बहुमताला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांचं काय मत आहे ऐकून घ्यावे लागतं. काही वाद निर्माण झाले असतील, काही मतभेद झाले असतील तर ते मतभेद पक्षामध्ये सोडवण्याची व्यवस्था उभी आहे. जिल्ह्याच्या पातळीवर एखादा प्रश्न सुटणार नसेल तर तो प्रदेश भाजपमध्ये चर्चेला घेऊ. एक दोन दिवस काही नाराजी राहू शकते, यावर आम्ही सर्व राज्यातले लोक बसून त्याचा निर्णय करू, असंही त्यांयांनी स्पष्ट केलं.