Download App

धनगर आरक्षणाप्रश्नी छ. संभाजीनगरमध्ये खलबतं, राम शिंदेंनी वेधलं सरकारचं लक्ष, मंत्री गिरीश महाजन लवकरच….

  • Written By: Last Updated:

जामखेड: धनगर आरक्षणाप्रश्नी (Dhangar reservation) जामखेड तालुक्यातील चोंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने आमरण उपोषणाचे अंदोलन सुरु आहे. या अंदोलनाच्या 11 व्या दिवशी मोठे यश आले आहे. आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धनगर समाजाच्या (Dhangar community) व्यथा आणि आरक्षणाच्या प्रश्नांवरून राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर सरकारने चोंडीतील उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नेमणूक केली, अशी माहिती आमदार राम शिंदेंनी दिली.

17 ते 22 सप्टेंबर 2023 या काळात संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचीत जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्यावतीने श्रीक्षेत्र चोंडी येथे गेल्या 11 दिवसांपासून आमरण उपोषणाचे अंदोलन सुरु आहे. बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर व सुरेश बंडगर व इतर आमरण उपोषण करत आहेत.या उपोषणाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

राज्यभरातील धनगर बांधव चोंडीत दाखल होऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अंदोलनास पाठिंबा देत आहेत. उपोषणाच्या आंदोलनास दहा दिवस उलटूनही महाराष्ट्र सरकारकडून या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे राज्यातील धनगर समाजाचा सरकारविरोधात रोष वाढला आहे. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. त्यामुळं चोंडीतील आमरण उपोषणाची दखल घेण्याबाबत आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची संभाजीनगर येथे भेट घेतली. दरम्यान, आता आमदार शिंदेंच्या पाठपुराव्यानंतर सरकारने आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी तातडीने पाऊले उचलली आहेत.

Devendra Fadanvis : मराठवाड्यात सात वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीचे फडणवीसांनी दिले ‘फुलप्रुफ’ उत्तर 

चोंडीत सुरु असलेल्या उपोषणाचं आणि धनगर समाजाच्या प्रश्नांचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने सकारात्मक पाऊले उचलावीत म्हणून आमदार शिंदेंनी सरकारकडे आग्रह धरला. यावेळी सरकारने उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री महाजन हे लवकरच चोंडी येथील उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. आमदार प्रा राम शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सरकार पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळं सरकार आता काय भूमिका घेते, याकडे राज्यातील धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.

याबाबत सरकार कोणतंही असो, पक्ष कोणताही असो, धनगर समाज सातत्यानं संयमाची शांततेची भूमिका घेऊन लोकशाही पध्दतीनं उपोषण करणं असेल, आंदोलन करणं असेल ही भूमिका पार पाडत आलेला आहे. गेल्या दहा दिवसांपासून चोंडीत उपोषण सुरू आहे. आमच्या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासन लक्ष देत नाही ही धनगर समाजाची भावना झाली आहे. परंतू असं न होता, राज्य सरकारने तातडीने लक्ष दिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून सरकारमधील मंत्र्यांच्या भेट घेऊन उपोषणाचं आणि धनगर समाजाच्या प्रश्नांचं गांभीर्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले. सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे लवकरच पोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत, अशी माहिती आमदार शिंदे यांनी दिली आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज