मुंबई : अजित पवार म्हणाले की आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता. पण मला वाटतं की त्यांचे एक मंत्री जेलमध्ये गेले आहेत. दाऊदची बहिण हसीना पारकरला त्यांनी चेक दिला होता. त्यांचा राजीनामा देखील घेऊ शकले नाहीत. त्यांचे साथीदार अजित पवार आहेत. बरं झालं आमची अजित पवार यांच्याबरोबर चहाची वेळ टळली. देशद्रोह मोठा की महाराष्ट्रद्रोह मोठा? अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केली.
लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. त्यासाठी नियम आहेत, कायदे आहेत. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना पक्ष आम्हाला दिला आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली नाही. याचा अर्थ तुमच्या बाजूने निकाल दिला की चांगला आणि विरोधात निकाल दिला की वाईट, अशी कसं काय भूमिका घेऊ शकता? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना केला आहे.
पुण्यात आम्हाला चांगला प्रतिसाद भेटतोय म्हणून त्यांची पोटदुखी होतीय. शरद पवारांनी दहा सभा घेतल्या. अजित पवार तर तिथंच गल्लीत पडले होते. त्यावेळी आम्ही विरोध केला नाही. निवडणूका आहेत. प्रचार करण्याचा सर्वाना अधिकार आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे.
उद्धव ठाकरे -केजरीवाल भेट होताच ‘आप’ला धक्का : मनीष सिसोदिया यांना अटक
जलसिंचन योजनेच्या 22 प्रकल्पांना मान्यता दिल्या आहेत. यामुळे पाच लाखांपेक्षा जास्त हेक्टर जामीन ओलीताखाली येणार आहे. मागच्या अडीच वर्षात एकही प्रकल्प मंजूर झाला नाही. मागच्या सरकारने बंद केलेली जलयुक्त सिंचन योजना पुन्हा सुरु केली आहे. सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. चार आठवड्याच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल. विरोधाकांनी लोकांच्या हिताचे मुद्दे मांडावेत. या अधिवेशनातून जनतेला काहीतरी देण्याचा युती सरकारचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.