Sanjay Raut on Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
खासदार राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नितीन देसाईंसारखा कलाकार ज्याने आपल्या कर्तुत्वाचा ठसा चित्रपटसृष्टीत कष्टाने, मेहनतीने उमटवला. या देशातील सर्वात उत्तम स्टुडिओ त्यांनी उभारला. अनेक चित्रपटांची निर्मिती केली. अशा या महान कलाकाराचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू व्हावा. त्यांना मृत्यूला कवटाळावं लागलं. देसाई यांनी आत्महत्या करताना जी व्हाइस नोट आहे ती समोर आणली गेली पाहिजे. जे प्रामाणिक उद्योगपती आहेत त्यांना सध्याच्या काळात कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागते हे कळाले पाहिजे.
एका बाजूला देशातून हजारो कोटी रुपये घेऊन अनेकजण बँकांना बुडवून पळत आहेत. जे भाजपसोबत आहेत त्यांची कर्जे माफ होत आहेत आणि कारवाई सुद्धा होत नाही. मात्र एक हरहुन्नरी मराठी माणूस शे दीडशे कोटी रुपयांचं कर्ज आपण फेडू शकलो नाहीत. जे स्वप्न एन डी स्टुडिओच्या माध्यमातून उभं केलं ते स्वप्न माझ्यासमोर विखुरताना दिसत आहे. हे सहन न झाल्यामुळे नितीन देसाईंनी आत्महत्या केली असे राऊत म्हणाले.
नितीन देसाई यांची एक्झिट मनाला चटका लावणारी ; राजकीय नेत्यांकडून हळहळ !
देसाई देश सोडून गेले नाहीत ना त्यांनी कोणाला फसवलं. कर्जतचा जो स्टुडिओ आहे त्याला चित्रनगरीचा दर्जा द्यावा. कारण ते एक मराठी माणसाचं स्वप्न होतं. तुम्ही म्हणत आहात फिल्म सिटी व्हावी मग कर्जतमधील देसाईंच्या स्टुडिओला चित्रपटनगरीचा दर्जा देण्याबाबत सरकारने विचार करावा अशी मागणी राऊत यांनी यावेळी केली.