Download App

“शरद पवारांना खात्री पटली म्हणूनच ते…” : मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीवर उदय सामंत यांनी सांगितलं कारण

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक काम करत आहेत, याची खात्री पटल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली, असं म्हणतं मंत्री उदय सामंत यांनी शिंदे-पवार भेटीवर प्रतिक्रिया दिली. ते रायगड येथे बोलत होते. काल (गुरुवार) शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जावून भेट घेतली. राज्यातील सत्तातरानंतर पहिल्यांदाच पवार यांनी शिंदे यांची भेट घेल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. (Minister Uday Samant reaction on CM Eknath Shinde and Sharad Pawar Meeting)

सामंत म्हणाले, एखादी व्यक्ती जर चांगली काम करणारी असेल, एखादे मुख्यमंत्री सकारात्मक काम करत आहेत, असं वाटतं असेल, त्यांनी सकारात्मक विकासकामाला सुरुवात केली असेल तर त्याच व्यक्तीकडून अपेक्षा असतात. शरद पवार यांनी याच उद्देशाने काल मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यांनाही आता खात्री पटली आहे की, मुख्यमंत्री सकारात्मक काम करत आहेत.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

दरम्यान, या भेटीवर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शरद पवार यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. ही राजकीय भेट नव्हती. मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या संस्थेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत. त्यांनी मला कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. कोणतेही राजकीय चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

पवार-शिंदे भेटीनंतर पवार-अदानी भेट

मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाल्यानंतर काही वेळताच शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांची भेट झाली. त्यामुळे या दोघांच्या भेटीला काही राजकीय कारण होते का असे सवाल विचारले जात आहे. यापूर्वी 20 एप्रिल रोजीही अदानी आणि पवार यांची भेट झाली होती.

Tags

follow us