RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

या प्रकरणात खदान मालक महेश भोईर याचे नाव समोर आले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

News Photo   2026 05 12T211851.294

RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून हत्या; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

जिल्ह्यातील विरारमध्ये भरदिवसा (Virar) घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. विरार पूर्वेतील शिरगाव परिसरातील खदानीत RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे ही घटना मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या समोरच घडली. या हल्ल्यात प्रभाकर पाटील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात खदान मालक महेश भोईर याचे नाव समोर आले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृत व्यक्तीची ओळख आत्माराम पाटील अशी झाली आहे. ते माहितीच्या अधिकाराचा वापर करून विविध प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणारे RTI कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

देवीचं दर्शनाला गेले अन् जीवनाची झाली अखेर, भिंत अंगावरून कोसळून भाविकांचा मृत्यू

मंगळवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास आत्माराम पाटील हे वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत शिरगाव येथील खदानी परिसरात गेले होते. ते व्हॅगनआर कारने घटनास्थळी पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, खदान मालक महेश भोईर याने त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर झालेल्या वादातून आत्माराम पाटील यांच्यावर दगडाने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेत मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुरावे गोळा करण्यात आले असून आरोपीचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

ही हत्या खदानीशी संबंधित वादातून झाली की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे विरार आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. RTI कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Exit mobile version