नवी दिल्ली : एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. राहुल गांधींनी वायनाड सोडावे आणि शेरवानी-काळ्या टोपीच्या माणसाशी लढावे असे चॅलेंज ओवैसी यांनी दिले आहे. ओवैसी यांच्या या आव्हानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) राहुल गांधींसाठी ढाल बनून मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी हे देशाचे सर्वमान्य नेते बनले आहेत. त्यामुळे ओवैसी यांना चॅलेंज द्यायचे होते तर, त्यांनी राहुल गांधींना न देता पंतप्रधान मोदींना द्यायचे होते असे राऊत म्हणाले. (Sanjay Raut On Asaduddin Owaisi Challenge To Rahul Gandhi )
ओवैसी यांच्या आव्हानावर बोलातान राऊत म्हणाले की, राहुल गांधी हे देशाचे सर्वमान्य नेते बनले असून, त्यांनी देशभरातून कुठूनही निवडणूक लढवली तरी ते जिंकून येतील. त्यामुळे ओवैसींनी विचार करून आव्हन द्यायला हवे होते. आव्हान द्यायचेच होते तर, त्यांनी राहुल गांधींऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यायला हवे होते. मोदी संविधान, कायदे आणि नियमांची पायमल्ली करून संसद चालवत असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.
असदुद्दीन ओवैसी नेमके काय म्हणाले होते?
काल (दि. 24) ओवैसी त्यांच्या हैदराबाद येथील मतदारसंघात एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी देशातील विविध मुद्द्यांवर परखडपणे भाष्य केले. तसेच राहुल गांधींनी वायनाडमधून नव्हे तर, हैदराबाद येथून निवडणुक लढवावी असे आव्हान दिले होते.
ओवैसी यांच्या या आव्हानापूर्वी राहुल गांधी यांनी तेलंगाणातील एका सभेत तेलंगणात काँग्रेस पक्ष BRS विरुद्ध नाही तर, BRS, BJP आणि AIMIM सोबत लढत असल्याचे विधान केले होते. हे सर्व पक्ष जरी स्वतःला वेगळे मानत असतील तरी आम्ही सर्वजण एकजुटीने काम करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात कोणतीही सीबीआय आणि ईडी चौकशी सुरू नाहीये कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना स्वतःचे मानत असल्याचा दावाही राहुल गांधींनी केला होता.