नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने (Nepal) मोठी जीवित आणि वित्तहानी झाली असून आतापर्यंत तब्बल 450 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पूरस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात येत असतानाच आता नेपाळसमोर पुन्हा एक गंभीर संकट उभे राहिले आहे. तिबेटमध्ये पुन्हा एकदा धरण फुटल्याने त्याचा परिणाम नेपाळमधील नदीकाठच्या भागांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळं नेपाळ सरकारने अनेक भागांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महापुरामुळं नेपाळमधील अनेक गावांचे मोठं नुकसान झालं असून घरे, रस्ते, पूल आणि इतर मालमत्ता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. या दुर्घटनेत 1200 पेक्षा अधिक नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोध आणि मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, तिबेटमध्ये हिमकडा कोसळणं आणि धरण फुटण्याच्या घटनांमुळं परिस्थिती आणखी चिंताजनक बनली आहे.
नेपाळनंतर आता चीनही हादरलं, भूकंपाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नक्की काय घडलं?
नव्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सरकारने सुरक्षा कर्मचारी, बचाव पथके आणि मदतकार्य करणाऱ्या यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीकाठच्या आणि संभाव्य धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आधीच महापुराच्या संकटातून सावरणाऱ्या नेपाळसमोर आता पुन्हा पाण्याचा धोका निर्माण झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे
या संपूर्ण परिस्थितीवर भारतासह अनेक देशांचं लक्ष असून नेपाळला मदतीचा हात देण्यात येत आहे. नेपाळमध्ये अनेक भारतीय पर्यटकही अडकले असून त्यांच्याशी सरकारकडून संपर्क साधला जात आहे. दुसरीकडं, तिबेटमधील परिस्थितीवरही आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष ठेवले जात आहे. एकामागून एक नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या नेपाळमध्ये पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
