दिल्लीतील एका न्यायालयाने आज (Delhi) माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतर २१ जणांना दारू घोटाळ्यातून निर्दोष मुक्त केलं. न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांतच केजरीवाल यांनी माध्यमांसमोर येत अनेकांवर जोरदार टीका केली. जर तुमच्यात हिंमत असेल तर दिल्लीत नव्याने निवडणुका घ्या. आज निवडणुका झाल्या, तर तुम्ही दिल्लीत १० पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही असं थेट आव्हान केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलं आहे.
मी देशभरातील लोकांचे आभार मानतो ज्यांनी अशा कठीण काळात आम्हाला पाठिंबा दिला. गेल्या चार वर्षांपासून ईडी, सीबीआय आणि इतर एजन्सींचा वापर आमच्यावर दारू घोटाळा नावाचा आरोप करण्यासाठी कसा केला गेला हे तुम्हाला माहिती आहे. सीबीआय आणि ईडीने त्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं. आज, न्यायालयाने आपल्या जवळजवळ ६०० पानांच्या आदेशात म्हटलं आहे की, या प्रकरणात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.
मद्य घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा ; निर्दोष मुक्तता
त्याचबरोबर हा खटला इतका बनावट आहे की, त्यावर खटलाही चालवता येत नाही असंही केजरीवाल यावेळी म्हणाले. तसंच,हा संपूर्ण कट कोणी रचला आणि का? हे संपूर्ण कट पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी रचला होता? दोघांनीही देशाची माफी मागितली पाहिजे. काँग्रेसशी संबंधित एका प्रश्नावर अरविंद केजरीवाल म्हणाले, मी तुम्हाला विचारतो, केजरीवाल तुरुंगात गेले का? रॉबर्ट वाड्रा तुरुंगात गेले का? संजय सिंह तुरुंगात गेले का? राहुल गांधी तुरुंगात गेले का? मनीष सिसोदिया तुरुंगात गेले का? सोनिया गांधी तुरुंगात गेल्या का? काँग्रेसवाले कोणत्या तोंडाने बोलतात? त्यांना लाज वाटत नाही असाही घणाघात केजरीवाल यांनी केला.
आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्याच्या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याचे स्वागत केलं आणि हा सत्य आणि संवैधानिक मूल्यांचा विजय असल्याचं म्हटलं आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते “सत्यमेव जयते” हा नारा देत होते, ज्यांनी दावा केला होता की त्यांचा पक्ष एक कट्टर प्रामाणिक पक्ष आहे आणि न्यायालयाच्या आदेशाने ते सिद्ध केले आहे.
