Download App

Chhattisgarh : उद्या निकाल, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं PM मोदींना पत्र; कारणही आलं समोर

Chhattisgarh News : छत्तीसगड विधानसभेसाठी मतदान संपलं असलं तरी (Chhattisgarh Elections 2023) राज्यातील राजकारण काही शांत झालेलं नाही. उद्या छत्तीसगड निवडणुकांच कौल जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी ऑनलाइन बेटिंग अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाच पत्र पाठवले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. प्रधानमंत्री मोदी यांना पत्र लिहून ऑनलाइन बेटिंगच्या बेकायदेशीर व्यवहारांशी संबंधित वेबसाइट्स, अॅप, टेलिग्रॅम, इंस्टाग्रॅम अकाउंट्स आणि युआरएल यांच्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी केल्याचे बघेल म्हणाले. ऑनलाइन बेटिंग, गेमिंगच्या माध्यमातून जुगार आणि सट्टा व्यापाराचा विस्तार देशभरात झाला आहे. विदेशात बसून या व्यापारावर नियंत्रण ठेवले जात आहे. त्यामुळे या ऑनलाइन बेटिंग अॅपवर बंदी घालावी अशी मागणी केंद्र सरकारला केल्याचे मुख्यमंत्री बघेल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, महादेव बेटिंग अॅप प्रकरणात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर आरोप झाले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम सोनीने सांगितले की भूपेश बघेल यांनी दुबईत जुगाराचा व्यवसाय उभा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आपल्या सहकाऱ्यांची सुटका करावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. यासाठी 508 कोटी रुपयेही दिल्याचा खळबळजनक दावा या आरोपीने केला होता. या प्रकरणात ईडीने 14 लोकांना आरोपी केले आहे. तसेच अनेकांना अटकही केली आहे. तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आता मोदी सरकार भूपेश बघेल यांच्या पत्राला काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Chhattisgarh Election : छत्तीसगडमध्ये भुपेश बघेल यांच्यासह ‘या’ नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

उद्या छत्तीसगडचा निकाल 

2018 मध्ये भाजपचा पराभव झाला. त्यानंतर भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा जाहीर केलेला नाही. त्याचवेळी काँग्रेसने सामूहिक नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला होता. पण, प्रचारादरम्यान भूपेश बघेल यांनी सूत्रे हाती घेतली. त्यांनी 72 निवडणूक सभा घेऊन राज्य पिंजून काढलं. हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले आहे. पण, दाव्यानुसार काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास भूपेश बघेल मुख्यमंत्री होऊ शकतात. बघेल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना 2018 च्या निवडणुकीत त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळं त्यांना पक्षाने मुख्यमंत्री पदी बसवलं. त्यांनी छत्तीसगडमधून माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नेतृत्वाखालील 15 वर्षांची भाजपची सत्ता उलथून टाकली होती.

follow us