Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला होता. (Plane) या घटनेतत २६० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तब्बल एका महिन्यांनी या अपघातासंदर्भात भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोचा (विमान दुर्घटनांशी संबंधित तपास करणारी संस्था-AAIB) अपघाताच्या कारणांबाबतचा एका अहवाल समोर आला आहे.
१२ जून रोजी अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानातील इंधन नियंत्रण स्विच बंद झालं होतं असं या अहवालात एएआयबीने म्हटलं आहे. मात्र, या अहवालानंतर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. या अहवालात विमानातील वैमानिकांचा संवादही समोर आला होता. त्यामध्ये एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारलं की, ‘तू इंधन पुरवठा का बंद केलास? तर दुसऱ्या वैमानिकाचे उत्तर होतं की, मी काहीही केलेलं नाही असा संवाद या अहवालातून समोर आला.
अहमदाबाद विमान अपघातप्रकरणी मोठी अपडेट; चौकशी अहवालावर वैमानिक संघटनेचा आक्षेप
दरम्यान, असं असतानाच आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. भारतातील नोंदणीकृत सर्व विमानांच्या इंजिन इंधन स्विचची तपासणी अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती समोर आली आहे. डीजीसीएने सर्व एअरलाइन्सना २१ जुलै २०२५ पर्यंत इंजिन इंधन स्विचची तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचंही समोर आलं आहे. मात्र, डीजीसीएचा हा आदेश विशेषतः बोईंग कंपनीच्या विमान मॉडेल्सशी संबंधित असणार आहे. ज्यामध्ये ७३७ आणि ७८७ ड्रीमलायनर (७८७-८/९/१०) या मालिकेचा समावेश आहे.
दरम्यान, अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या ड्रीमलायनर या विमानाच्या अपघाताबाबतचा एएआयबीचा अहवाल समोर आल्यानंतर डीजीसीएने आता हे पाऊल उचललं आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं की, या अपघाताच्या घटनेचा समोर आलेला अहवाल हा केवळ प्राथमिक आहे. अंतिम निष्कर्ष जाहीर होईपर्यंत आताच निष्कर्षांपर्यंत पोहोचू नका. फक्त वैमानिकांच्या संभाषणावरून निष्कर्ष काढण्यात येऊ नये, असं आवाहन मंत्री राम मोहन नायडू यांनी माध्यमांना आणि जनतेला केलं आहे.