Lashed by torrential rain : देशभरातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळ, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये पावसाने मोठे नुकसान केले असून पूर, भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरस्थिती आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण बेपत्ता आहेत. राज्य सरकारने बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू केले असून राज्यभरात 209 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत.
या शिबिरांमध्ये 5 हजार 792 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार, या आपत्तीत 13 जण जखमी झाले आहेत. तसेच 27 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून 196 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील कुट्टनाड आणि अप्पर कुट्टनाड परिसरात पुराचा धोका अधिक वाढला आहे. पंबा आणि अचन्कोविल नद्यांच्या पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. वीयपुरम आणि चेरुथाना गावांमध्ये पुरामुळे शंभरहून अधिक घरांवर परिणाम झाला आहे.
अलाप्पुझामध्ये सध्या 11 मदत शिबिरे सुरू असून त्यामध्ये 169 कुटुंबांतील 580 नागरिक आश्रय घेत आहेत. कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या भूस्खलनात एकाच कुटुंबातील तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मल्लिकार्जुन (वय 35), त्यांची पत्नी नागवेणी (वय 28) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा संतोष यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी हे तिघेही डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या त्यांच्या घरात झोपले होते.
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; मुख्यमंत्र्यांच्या काकांना विश्वास
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यात शनिवारी झालेल्या ढगफुटीमुळे छतरू परिसरात अचानक पूरस्थिती निर्माण झाली. या पुरात अनेक घरे आणि दुकाने नुकसानग्रस्त झाली असून दोन वाहने पाण्यात वाहून गेली आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून किश्तवार, डोडा आणि रामबन जिल्ह्यांतील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
उत्तराखंडमध्येही पावसामुळे अडचणी वाढल्या आहेत. उत्तरकाशीतील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन झाल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. चमोली जिल्ह्यातील गौचरजवळ कामेडा येथे बद्रीनाथ महामार्गाचा सुमारे 20 मीटरचा भाग खचल्यामुळे या मार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने 7 ऑगस्टपर्यंत राज्यात खराब हवामानाचा इशारा दिला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील बांदीपोरा येथे रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या आणि ओढ्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी पावसाचा अंदाज व्यक्त केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या या पावसाळी संकटामुळे प्रशासन सज्ज झाले असून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
