RBI New Kill Switch Feature To Prevent Digital Banking Frauds In India : सामान्य नागरिकांची कष्टाची कमाई ‘पलक झपकते’ गायब करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी RBI सर्वात मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित आणि चिंतामुक्त करण्यासाठी केंद्रीय बँक लवकरच ‘किल स्विच’ तंत्रज्ञान आणणार आहे, ज्यामुळे एका क्लिकवर संभाव्य फ्रॉड जागेवरच रोखता येण्यास मदत होणार आहे. नेमकं RBI चं किल स्विच काय? ते कसं काम करणार? त्याबाबत जाणून घेऊया…
काय आहे ‘किल स्विच’ आणि ते कसे काम करणार?
सध्याच्या व्यवस्थेत जर सायबर चोरांना तुमच्या खात्याची माहिती मिळाली, तर काही सेकंदांत खाते रिकामे होते. यावर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी ‘किल स्विच’ काम करेल. जर एखाद्या ग्राहकाला आपल्या बँक खात्यात संशयास्पद हालचाल किंवा फसवणूक होत असल्याचा संशय आला, तर तो फक्त एका क्लिकवर खात्यातून होणारे सर्व डेबिट (पैसे काढणे/ट्रान्सफर होणे) व्यवहार त्वरित रोखू शकेल.
सध्या अशी ‘स्विच ऑन/ऑफ’ सुविधा फक्त डेबिट किंवा क्रेडिट कार्डपुरती मर्यादित आहे. मात्र, आता ही सुविधा सर्व प्रकारच्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सायबर भामट्यांच्या हाती खात्याची माहिती लागली, तरी ग्राहकांच्या सतर्कतेमुळे होणारे नुकसान वेळीच टळू शकणार आहे.
मोठ्या UPI व्यवहारांवर असणार ‘टाईम-लॅग’चा पहारा
केवळ ‘किल स्विच’च नाही, तर यूपीआय (UPI) द्वारे होणाऱ्या मोठ्या आर्थिक फसवणुकीला लगाम घालण्यासाठीही आरबीआयने एक महत्त्वाचा प्रस्ताव ठेवला आहे. या नव्या नियमानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदाच दुसऱ्या व्यक्तीला यूपीआयद्वारे मोठी रक्कम पाठवेल, तेव्हा त्या व्यवहारात सिस्टिमकडून जाणीवपूर्वक काही वेळेचा विलंब म्हणजे टाईम-लॅग केला जाईल. या तात्पुरत्या विलंबाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर, एखाद्या ग्राहकाची फसवणूक करून किंवा धाक दाखवून पैसे ट्रान्सफर केले जात असतील, तर तो व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच ग्राहकाला तो ब्लॉक करता येईल.
AI करणार पैशांची रखवाली
सायबर गुन्हेगारांपेक्षा दोन पावले पुढे राहण्यासाठी आरबीआय याच वर्षी ‘डिजिटल पेमेंट्स इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म’ (DPIP) देखील सुरू करणार आहे. हे अत्याधुनिक सिस्टिम पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित असेल. देशात होणाऱ्या प्रत्येक डिजिटल व्यवहारावर हे सिस्टिम रिअल-टाईम लक्ष ठेवेल आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनला एक ‘रिस्क स्कोर’ देईल. यामुळे कोणत्याही प्रकारची तांत्रिक किंवा आर्थिक गडबड झाल्यास त्याची ओळख बँकेला आणि ग्राहकाला त्वरित पटेल.
देशात डिजिटल व्यवहारांचा वाढता आलेख
आरबीआयच्या एका सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, केवळ वेगवान आणि सोयीस्कर सुविधेमुळे देशातील 52 टक्के लोक डिजिटल पेमेंटचा वापर करत आहेत. तर, 67 टक्के व्यापाऱ्यांचा व्यवसाय यामुळे वाढला आहे. अशा परिस्थितीत, सर्वसामान्यांचा वाढता विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आरबीआयचे ‘किल स्विच’ आणि ‘एआय मॉनिटरिंग’ तंत्रज्ञान डिजिटल विश्वात एक भक्कम आणि अचूक सुरक्षा कवच ठरणार आहे.
